Supria Sule : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारी करत असल्याचे दिसत आहे. त्यातच जागा वाटपावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. याच मुद्दावर आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. त्यासोबतच राज्यातील कायदा आणि सुव्यस्थेविषयी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
याविषयी बोलताना, “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्रीपदाची जबाबदारी संभाळण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. ते गृहमंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे”,अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. पुढे बोलताना “महाराष्ट्र पोलिसांच्या सातत्याने बदल्या करण्यात येत आहेत. त्यांना पारदर्शकपणे काम करु दिले जात नाही. गेल्या 15 दिवसांपूर्वी केंद्र सरकारने गुन्हेविषयक नवं विधेयक मांडलय.ज्यामध्ये फोन टॅपिंग अधिकृत करण्यात आलीये. गृहमंत्रालय पूर्णपणे अपयशी ठरलंय, असा दावाही सुळे यांनी केला.
पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि देशाच्या समाजकारणात आंबेडकर कुटुंबीयांनी मोठं योगदान दिलंय. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही चांगल्या पद्धतीने काम केलंय. संविधान आणि देश वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांची गरज आहे. नव्या पिढीला त्यांनी मार्गदर्शन करावे. इंडिया आघाडीतही त्यांचा मोठा रोल असणार आहे, असा मला विश्वास आहे. संविधानासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी आम्ही सर्वांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलावर बोलताना “लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे.फक्त त्यावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. अनेक महिन्यांपूर्वीचं हा फॉर्म्युला दिल्लीत ठरला होता. लवकरच महाविकास आघाडी जागावाटपाबाबत निर्णय घेईल, असेही सुळे यांनी म्हटले आहे. मी लहान कार्यकर्ती आहे. सध्या तरी जनतेची सेवा आणि लोकसभेतील सहभाग यावरच माझा सहभाग आहे,असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
तसेच महाराष्ट्रातील प्रकल्प दुसऱ्या राज्यात नेले जात आहेत. गुंतवणूक होत नाहीये. हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. यावर महाराष्ट्रातील ट्रीपल इंजिन सरकार गप्प आहे. खोके सरकारकडे 200 आमदार असूनही महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायावर कोणीही बोलत नाही,अशी टीका सुळे यांनी केली.