नवी दिल्ली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आजची सुनावणी होती. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होती.यावेळी न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.
महाराष्ट्रातील 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी काय काय केले याची माहिती सादर करण्याचे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले. न्यायालयाने 11 मे रोजी आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांवर सोपविला होता. यात आतापर्यंत काय झाले ही माहिती तीन आठवड्यांत सादर करण्यास सांगितले आहे.
पुढील एका आठवड्याच्या आत विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीला सुरुवात करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. हे न्यायालय विधानसभा अध्यक्षांचं आदर करतं, पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रतिष्ठा राखली जावी, अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे आम्ही निर्देश देतो की विधानसभा अध्यक्षांनी एका आठवड्याच्या आत या प्रकरणाची सुनावणी करावी, असं सर्वोच्च न्यायालयाने यावेळी म्हटलं आहे.
न्यायालयाने 11 मे रोजी आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष यांनी घ्यावा, असे म्हटले होते; परंतु विधानसभेचे अध्यक्ष यांनी याबाबत काहीही केले नसून जाणीवपूर्वक वेळ ढकलला जात आहे, असा आरोप करणारी याचिका सिब्बल यांनी दाखल केली होती.न्यायालयाने आता विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केल्याने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकर लागणार का ? याकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.