नवी दिल्ली : मतभेद असणाऱ्यांना देशद्रोही ठरवणे हे अस्वस्थ करणारे आहे. महात्मा गांधी यांच्या असहकार चळवळीचा आत्माच मतभेद हा होता, असे मत सर्वोच्च न्यायलयाचे न्यायमुर्ती दीपक गुप्ता यांनी व्यक्त केले.
तुम्ही विरूध्द विारसरणीचे आहात याचा अर्थ तुम्ही राष्ट्रद्रोही आहात किंवा तुम्ही देशाचा आदर करत नाही असा होत नाही. लोकशाही आणि मतभेद यावर दिल्ली बार असोसिएशनने आयोजित केलेल्या व्याख्यानात न्या. गुप्ता बोलत होते. मतभेद असणाऱ्या देशद्रोही अथवा लोकशाही विरोधी असे घाऊक ठपके ठेवणे हे घटनेनच्या तत्वाचे रक्षण करणाऱ्यांच्या मनावर ओरखडे उमटवणारे आहे.
सरकार आणि देशामधील मतभेदांवर भाष्य करताना ते म्हणाले, तुमचे कदाचित सरकार सोबत मतभेद असू शकतात, म्हणजे तुम्ही देश विरोधी आहात असा त्याचा अर्थ होत नाही. सरकार आणि देश या दोन भिन्न गोष्टी आहेत. मतभेदावर आक्षेप म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकार हे नेहमी बरोबरच असते असे नाही. शांततापूर्ण पध्दतीने त्यावर तोडगा निघेपर्यंत निदर्शने करण्याचा विरोधकांना हक्क आहे. अलीकडेच काही विरोध करणाऱ्या लोकांना देशद्रोही असे संबोधण्यात आले. तुमच्या पक्षाला 51 टक्के (मते) मिळाली याचा अर्थ 49 टक्क्यांनी पाच वर्ष गप्प बसायचे असा त्याचा अर्थ होत नाही, असे न्या. गुप्ता म्हणाले.