- पोर्टलमधील तांत्रिक अडचणीमुळे पालक हैराण
- अर्ज भरण्यासाठी उरले चार दिवस
पिंपरी – आरटीई प्रवेश प्रकियेला सुरुवात झाल्यापासून सुरू असलेली अडथळ्यांची शर्यत संपण्याचे नाव घेत नाही. शाळांनी ऑनलाइन नोंदणीकडे पाठ फिरविल्यानंतर आता आरटीईच्या पोर्टलला तांत्रिक अडचणीचे विघ्न लागले आहे. मागील चार दिवसांपासून पोर्टल बंद असल्यामुळे शकडो पालकांना प्रवेश अर्ज करता आलेले नाहीत. त्यामुळे, पालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, आरटीईचे पोर्टल त्वरित सुरळीत करावे, अशी मागणी पालकांतून होऊ लागली आहे.
यावर्षी आरटीईची प्रक्रिया सुरू झाल्यापासूनच प्रशासन या प्रवेश प्रक्रियेकडे गांभीर्याने पहात नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. शाळा नोंदणी प्रक्रिया झाल्यानंतर दि. 11 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र, पालकांना आपल्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. आरटीईचे संकेतस्थळच सुुरळीत चालत नसल्याने एका विद्यार्थ्यांचा अर्ज भरण्यासाठी काही तासाचा कालावधी लागत आहे. त्यात मागील चार दिवसांपासून तांत्रिक अडचणीमुळे सतत पोर्टलमध्ये बिघाड होत असल्यामुळे शेकडो पालकांना अर्ज करता आलेले नाहीत.
पोर्टलमधील तांत्रिक अडचणीमुळे पालकांना मोबाइलवर एसएमएस जात नाही. पोर्टल बंद असतानाही आरटीईच्या संकेतस्थळावर नवीन रजिस्ट्रेशन केल्यानंतर स्क्रिनवर येणारा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड जतन करून ठेवल्यास पालकांना अर्ज भरता येईल, असा संदेश चार दिवसांपासून झळकत आहे. त्यामुळे पालक सातत्याने अर्ज करीत आहेत. मात्र, मोबाइलवर एसएमएस जात नसल्याने पालक हैराण झाले आहेत.
पोर्टल तांत्रिक अडचणीमुळे बंद असतानाही प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्यामुळे पालकांतून संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने पोर्टल त्वरित सुरुळीत करावे, अशी मागणी पालकांतून होऊ लागली आहे.
अर्ज भरण्यास उरले चार दिवस
दि. 11 फेब्रुवारीपासून आरटीईसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, पोर्टलमध्ये सातत्याने बिघाड असल्यामुळे अनेक पालकांना आखणी अर्ज करता आलेले नाहीत. एक अर्ज भरण्यास चार ते पाच तासांचा वेळ लागत आहे. अशातच मागील चार दिवसांपासून पोर्टल बंद असून, आखणी शेकडो पालक अर्ज भरण्यापासून वंचित राहिले आहेत. आता केवळ चार दिवसांचा आवधी उरला असल्यामुळे आतातरी पोर्टल सुरळीत करावे, अशी मागणी पालकांमधून होत आहे.