अभियंता म्हणून सक्रियपणे काम करत असताना ध्यानीमनी नसताना तरन्नुम अल्ताफ सय्यद यांच्याकडे राजकीय जबाबदारी आली. पण येईल ती जबाबदारी नेटानं पेलण्याच्या त्यांच्यातल्या अंगभूत गुणांमुळं त्यांनी थेट उपनगराध्यक्षपदापर्यंत मजल मारली आहे, त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासावर खास महिलादिनानिमित्त ‘प्रभात’ने टाकलेला ‘प्रकाश’.
हिऱ्याचा दगड इतर दगडांसारखाच असतो; पण या दगडाला कोंदण पाडले की त्यातला हिरा लख्खपणे दिसायला लागतो. कोंदणानंतरच या हिऱ्याला खऱ्या अर्थानं मोल येतं. नेमकं असंच वातावरण तरन्नुम अल्ताफ सय्यद यांना मिळाली. त्यांचे पती अल्ताफ सय्यद असो, ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे राजेंद्र पवार असो वा उपमुख्यमंत्री अजित पवार असो… या सगळ्यांनीच तरन्नुम यांच्यातल्या नेतृत्वाचा हिरा शोधला आणि त्याला प्रोत्साहन दिलं. त्यामुळंच उच्चशिक्षित महिला, गृहिणी ते उपनगराध्यक्षपदापर्यंतचा प्रवास सुकर होऊ शकला.
तरन्नुम सय्यद यांचा जन्म दौंडमधला. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यातल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं. तिसऱ्या वर्षांत त्या महाविद्यालयात सर्वप्रथम आल्या. तेव्हापासून त्यांच्या आयुष्याला वेगळीच दिशा मिळाली, त्याबद्दल सांगताना तरन्नुम म्हणाल्या, खरंतर पॉलिटेक्निक कॉलेजमधून शिक्षण झाल्यानंतर मला बीई करायचं होतं. पण त्याच वेळी माझं लग्न झालं. त्यामुळं मला ते करता आलं नाही. खरंतर माझे पती अल्ताफ यांनी मला ऍडमिशन घेऊ या असं सुचवलं होतं; पण एकत्र कुटुंबामुळं माझ्या अभ्यासावर परिणाम झाला असता. त्यामुळं मी बीईला प्रवेश घेतला नाही. त्यानंतर चार-पाच वर्षांनी शारदाबाई महिला महाविद्यालयात नोकरीसाठी जागा निघाल्या. मी अर्ज केला आणि राजेंद्र पवार यांनी मला तिथं काम करण्याची संधी दिली. ते वर्षं होतं 2005! खरंतर 2005 ते 2007 या तीन वर्षांत राजेंद्र पवार यांच्यामुळं कन्स्ट्रक्शन या विषयाकडे बारकाईनं कसं बघावं, हे मी शिकले. खरंतर ते माझे गुरूच आहेत, या विषयातले. याच कालावधीत सुनंदा पवार यांनी हॉस्टेलचं काम दिलं. तसंच इतर इमारतींच्या मेंटेनन्सचं करण्याची जबाबदारीही सोपवली. हा एकूणच काळ नवं काही समजून घेण्याचा आणि शिकण्याचा होता.”
सुनंदा पवार या ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त आहेत, तर राजेंद्र पवार हे चेअरमन आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेचं कामही तरन्नुम पाहू लागल्या. 2007 पासून संस्थेनं अनेक नवनवे प्रकल्प सुरू केले. त्यातला महत्त्वाचा प्रोजेक्ट होता, केव्हीकेचा! 18 एकरामध्ये विविध विकास कामं, रस्त्यांची कामं, लॅब, पावसाच्या पाण्याची व्यवस्था अशा सगळ्या गोष्टी केव्हीकेचा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर ऍग्रीकल्चर कॉलेजचा प्रकल्प सुरू झाला. त्यात कॉलेजची बिल्डिंग, मुलांचं हॉस्टेल, अकरावी-बारावीचं कॉलेज, इंटरनॅशनल गेस्ट हाऊस याची कामं सुरू झाली. ही जबाबदारीही तरन्नुम यांनी यशस्वीपणे पार पाडली. हे सगळं काम सुरू असतानाच अल्ताफ यांना पतसंस्था सुरू करावी, असं वाटू लागलं.
खरंतर तरन्नुम यांचे पती अल्ताफ हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हाडाचे कार्यकर्ते. त्यांचा परिसरात दांडगा जनसंपर्क आहे. त्यावेळी पतसंस्थेत भ्रष्टाचार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुरुषांच्या पतसंस्थेला परवानगी द्यायची नाही, असा नियम केला होता. मग तरन्नुम यांनी नेतृत्व करत 13 महिलांना सोबत घेऊन ही पतसंस्था सुरू केली. या 13 महिलांनी 500 रुपये भरून पतसंस्थेचे सभासद व्हा, असं बारामती शहरात आवाहन केलं. एका पत्र्याच्या खोलीत सुरू झालेल्या या पतसंस्थेच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः आले होते. या पतसंस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तरन्नुम यांचा समाजकारणातला प्रवास सुरू झाला, असं म्हणता येईल. पतसंस्थेच्या माध्यमातून 2100 महिलांचं जाळं त्यांनी उभं केलं. बचतगटांच्या माध्यमातून महिलांना कर्ज वाटप करून त्यांनी स्वतःचे छोटेखानी उद्योग उभे केले आहेत.
विशेष म्हणजे मुस्लीम समाजातील महिला घराबाहेर पडत नाहीत, त्यामुळं त्यांचा विकास होत नाही. तरन्नुम यांचं वैशिष्ट्य हे की या महिलांकडे जाऊन त्यांच्यात त्यांनी नवं काही करण्याचा आत्मविश्वास पेरला. आज या पतसंस्थेचे मोठ्या वटवृक्षात रुपांतर झालं आहे. पाच कोटी रुपयांची ठेव आणि तीन कोटी रुपयांचं कर्ज वाटप इथपर्यंतचा पल्ला त्यांनी गाठला आहे. तसंच अलीकडेच नव्या जागेत पतसंस्थेचं स्थलांतर झालं त्याच्या उद्घाटनालाही अजित पवार आले होते. या सगळ्याच प्रवासाचे ते साक्षीदार आहेत.
राजकीय प्रवासाची सुरुवात
अल्ताफ सय्यद हे नगरसेवक म्हणून त्यांना निवडणूक लढवायची होती. पण मधल्या काळात राजकारणात बदल झाले आणि त्यांच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये ओबीसी महिला असं आरक्षण पडलं. त्यामुळं मग त्यांची संधी गेली. पण तेव्हा अजित पवार यांनी त्यांना स्वतःहून बोलवून घेतलं आणि तुझा फॉर्म यावेळी भरता येणार नाही, पण तुझ्या बायकोला फॉर्म भरायला सांग’ खरंतर तरन्नुम या राजकारणात तेव्हा कुठंही सक्रिय नव्हत्या. मात्र, अल्ताफ हे अजित पवार जे सांगतील ते करण्याचं त्यांनी ठरवलं. राजकीय प्रवेशाबद्दल बोलताना तरन्नुम म्हणतात, हे तिकिटाचं ठरलं तेव्हा माझा आणि अजित पवार यांच्याशी जवळपास शून्य संवाद होता. पण निवडणुकीच्या काळात मात्र ते घेत असलेल्या बैठका, सभा यातून त्यांची कार्यपद्धती समोर आली. अखेर अजित पवारांच्या प्रयत्नानं मला निवडणुकीत 3200 मतांची आघाडी मिळत मी विजयी झाले. या विजयात माझ्या प्रभागातल्या जनतेचाही खूप मोठा वाटा आहे. कारण मी राजकारणात नवीन असतानाही त्यांनी मला संधी दिली.”
निवडून आल्यानंतर तरन्नुम यांनी मागं वळून पाहिलंच नाही. त्यांच्या कामाचा अनुभव बघून अजित पवार यांनी त्यांना आरोग्य समितीचं सभापतीपद दिलं. तरन्नुम यांनी लगेचच आरोग्य समितीशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन स्वच्छता, घंटागाडीचा तसेच आरोग्य विषयक कामांचा निपटारा करायला सुरुवात केली. शहराच्या स्वच्छतेवर भर आणि त्यातून आरोग्याची जपणूक हा मंत्र जपत त्यांनी कामावर भर दिला.
आरोग्य विभागातलं काम बघून अजित पवार यांनी त्यांना उपनगराध्यक्षपदाची संधी दिली. या संधीलाही योग्य न्याय देण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. उच्चशिक्षित असलेल्या महिलेच्या नेतृत्वगुणाला वाव देण्याचं महत्त्वाचं काम अजित पवारांनी केलं आहे. अजित पवार यांनी टाकलेल्या याच विश्वासास पात्र ठरायचंच, याच जोमानं तरन्नुम यांची वाटचाल सुरू आहे. एक अभियंता ते उपनगराध्यक्षपद हा प्रवास महिला म्हणून स्वतःला अधिकाधिक उंचीवर नेणारा असाच आहे.
एकता इंग्लिश मीडियम स्कूलची उभारणी
इंग्रजी माध्यमांमधील सध्याचं शिक्षण खूप महाग झालं आहे. ते तळागाळातल्या पालकांना परवडत नाही. त्यामुळंच तरन्नुम सय्यद यांनी एकता इंग्लिश मीडियम स्कूलची संकल्पना मांडली. यासाठी अजित पवार यांचे मोलाचं सहकार्य त्यांना लाभलं आहे. त्यांच्या शाळेत बहुसंख्येनं मुस्लीम विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. केवळ 5000 रुपये वर्षभराची फी ते आकारत आहेत. आज त्यांच्या शाळेत 300 पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेच्या सल्लागार म्हणून त्या संस्थेचे काम पाहत आहेत.
एकाहून अधिक आघाड्यांवर काम..
ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, एकता इंग्लिश मीडियम स्कूल, पतसंस्था आणि उपनगराध्यक्षपदाची नवी जबाबदारी या सर्व आघाड्यांवर तरन्नुम काम करत आहेत. असं असलं तरीही एकाही जबाबदारीकडे त्यांचं दुर्लक्ष होत नाही हे विशेष! स्त्रीमध्ये खऱ्या अर्थानं सर्वार्थता असते, हे त्यांच्याकडे पाहिल्यावरच लक्षात येतं.
अजित पवारांकडून काय शिकायला मिळालं?
मोठा माणूस, छोटा माणूस असा भेदभाव करत नाहीत
कोणत्याही कामाचा बारकाईनं विचार करतात
काम करणाऱ्या माणसाच्या पाठिशी उभं राहातात.
झपाट्यानं काम करतात
भविष्याची दिशा…
महिलांसाठी मोबाइल टॉयलेट शहराच्या भागात उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच बारामती नगरपालिकेतच्या माध्यमातून सुरू असलेल्या सर्व बांधकाम दर्जेदार करून घेणार वेळोवेळी त्याठिकाणी भेटी देऊन संबंधित ठेकेदाराकडून अजित दादांना अभिप्रेत असणारे दर्जेदार काम करण्यासाठी त्या प्रयत्नशील राहणार आहेत.
मुस्लीम समाजासाठी पाच कोटींच्या निधीची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यातून शादीखाना दफनभूमी व उर्दू हायस्कूल ही कामे मार्गी लागणार आहेत.
झोपडपट्टी मुक्त बारामती करण्याच्या दिशेनं कामकाज.
मुस्लीम महिलांसाठी आशेचा किरण…
तरन्नुम सय्यद मुस्लीम महिलांसाठी आशेचा किरण बनल्या आहेत. त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यात त्या तत्पर असतात. त्यांच्या कामांच्या धडाडीमुळं मुस्लीम महिलांमध्ये नवी उर्जा निर्माण झाली आहे. त्यांना नवं बळ मिळालं आहे.
मोलाची साथ…
राजकीय प्रवासात तरन्नुम यांना त्यांचे पती अल्ताफ सय्यद यांची मोलाची साथ मिळाली आहे. नगरसेवकपद मिळालं नसलं तरीही ते नाराज न होता, पक्षाचं काम अधिक जोमानं करत आहेत. मुस्लीम कॉपरेटिव्ह बॅंकेच्या डायरेक्टरपदावर त्यांची निवड झालेली आहे, बॅंकेचे अध्यक्ष पी ए इनामदार यांच्यामुळे ही संधी मिळाली .सासरे हैदरभाई सय्यद यांचीही मला मोलाची साथ मिळत आहे, इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना वडील अब्दुल रहीम यांची प्रेरणा महत्त्वाची ठरली हे आवर्जून नमूद करावं लागेल.
संकलन : प्रमोद ठोंबरे, बारामती (तालुका प्रतिनिधी)