शैलेश धारकर
गुन्हा रोखणे आणि गुन्हेगारात कायद्याचा धाक निर्माण होणे यासाठीचा सरधोपट मार्ग म्हणजे चकमक करणे किंवा एन्काउंटर करणे हा वाटत आहे. पोलिसांची ही जुनीच पद्धत आहे आणि प्रत्येक चकमकीमागे सांगण्यात येणारे कारण देखील सारखेच असते. पोलिसांच्या तावडीतून गुन्हेगाराचा पळण्याचा प्रयत्न, पोलिसांचे शस्त्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न, शौचास जाण्याचा बहाणा करून पळ काढण्याचा प्रयत्न आदी कारणे सांगितली जातात.
हैदराबाद चकमकीत देखील हेच कारण सांगितले गेले होते. आरोपींनी पोलिसांकडून शस्त्र हिसकावून घेतली आणि हल्ला करून त्यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या चकमकीत गुंड मारले गेले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या आयोगाने ही चकमक बनावट असल्याचे सांगितले आणि संबधित पोलिसांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. उत्तर प्रदेशचा कुख्यात गुंड विकास दुबे देखील असाच चकमकीत मारला गेला. उज्जैनहून उत्तर प्रदेशला आणताना वाटेत दुबेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याला ठार केले.
सुमारे अडीच वर्षापूर्वी हैदराबादच्या टोलनाक्यावरून एका मुलीचे अपहरण करण्यात आले आणि तिच्यावर बलात्कार करून तिला मारून रस्त्यावर फेकून दिले. या घटनेवरून देशभरात संतापाची लाट उसळली. काही दिवसांनंतर हैदराबाद पोलिसांनी चौघांना अटक केली. त्या चौघांना घेऊन पोलीस घटनास्थळी गेले आणि तेथेच चकमक घडवून आणली. हैदराबाद पोलिसांच्या कारवाईचे सर्वांनी कौतुक केले; परंतु बलात्कारप्रकरणी संशयाची सुई ही दुसरीकडे जात होती. त्यामुळे काही जणांना हैदराबाद पोलिसांची कारवाई पचनी पडली नाही.
हैदराबाद प्रकरणात आरोपींना केलेली अटक आणि चकमक याबाबत पोलिसांकडून दिलेली माहिती ही नाटकी वाटली आणि परिणामी संशय बळावला. त्याच्या तपासाचे आदेश दिले. तपासात संशय खरा ठरला. जर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई केली तर त्या चार गुंडांचे सत्य समोर येईल. तसेच बलात्कार प्रकरणात सामील असलेल्या अन्य लोकांची ओळखदेखील पटेल. पण आरोपींना मारल्याने पोलिसांचे काम आणखी सोपे झाले. कारण अशा कृतीने तपासाची फाइल बंद झाली. अर्थात, हे काय देशातील पहिले प्रकरण नाही. पोलिसांनी तपास आणि दीर्घकाळ चालणारे खटले यापासून वाचण्यासाठी अशा प्रकारणांचा निपटारा चकमकीच्या आधारे केला.
मानवाधिकार संघटनेनेदेखील याप्रकरणी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहे. अनेक बाबतीत तर पोलिसांना फटकारे देखील ओढले आहेत; परंतु ही प्रवृत्ती संपलेली नाही. कमी जास्त प्रमाणात राज्यातील पोलीसदेखील हाच मार्ग अवलंबतात. चकमकीचा अर्थ असा की गुंडांनी हल्ला केल्यास पोलिसांनी आपल्या बचावासाठी गोळीबार करावा. या कारणाशिवाय पोलिसांना कोणावरही गोळीबार करता येत नाही.
चकमकीत देखील पोलिसांनी कोठे गोळी मारावी याचे अलिखित नियम ठरलेले आहेत. कंबरेच्या खाली गोळी मारून गुंडांना पकडावे आणि त्यांना न्यायालयात हजर करावे असे सांगितले गेले आहे. या आधारे गुन्ह्यांचा अधिक सखोल तपास होईल; परंतु कडक कायदा आणि सुव्यवस्थेचा अर्थ म्हणजे चकमकीत गुंडांचा खात्मा करणे हाच काढला जात आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून तर सार्वजनिक रूपातूनच अशी घोषणा केली आहे. अशा स्थितीत गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलिसांकडून कायदेशीर मार्ग अवलंबिण्याची अपेक्षा करणे चुकीचे राहू शकते.