पुणे- मागील काही दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा चढत असून, उन्हाचा चटका देखील वाढत आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच शहरात उन्हाची चांगलीच झळ बसत आहे.
मंगळवारी कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचले असल्याने, नागरिकांकडून आगामी महिन्यातील उन्हाळ्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
मध्य महाराष्ट्रावर चक्रीय चक्रवात तयार झाला आहे. गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या बहुतांश भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तर कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात किंचित वाढ झाली आहे.
राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आणि कोकण गोव्याच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.