भुलेश्वर – सीताफळाचे आगार म्हणून ओळख असलेल्या पुरंदर तालुक्यातील सीताफळ बागांच्या उन्हाळी बहराला सुरुवात झाली आहे. सीताफळ बागांना पाणी सोडल्याने बागा ऐन उन्हाळ्यात हिरव्यागार झाल्या आहेत. मात्र, लॉकडाऊनमध्ये सुमारे अडीच हजार बागांमधील सीताफळ ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे माळशिरस भागातील शेतकऱ्यांना 20 कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे.
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात गुऱ्होळी, सिंगापूर, वाघापूर, राजेवाडी, आंबळे, टेकवडी, पारगाव, पिसर्वे, माळशिरस, पोंढे आदी गावांमध्ये सीताफळ बागांचे क्षेत्र जवळपास 950 ते 1000 हेक्टर आहे. परिसरातील 2 हजार 500 एकर इतक्या क्षेत्रातील सीताफळ बागांतून अर्थकारणाला गती मिळाली आहे.
एकरात सुमारे 200 झाडे असतात. उन्हाळी बहर असताना प्रती झाडाला अंदाजे 20 किलो फळे येत आहे. प्रति कॅरेट चारशे रुपये भाव मिळतो. मात्र, लॉकडाऊनमुळे सीताफळाला मागणी असताना पुरवठा करण्यासाठी अडचणी येत आहेत.
पूरक घटकांना जबरी तडाखा
उन्हाळी हंगामात प्रति एकर 80 हजारांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे, त्यामुळे एका झाडापासून चारशे रुपयांचे नुकसान झाले आहे. हा आकडा 20 कोटींच्या घरातला आहे. लग्नसराईमध्ये सीताफळ रबडी बनविण्यासाठी वापरले जाते. यावर्षी लग्नसराईला ब्रेक मिळाला असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. विक्रीक्षम शेतीमालाची विक्री कुठे करायची, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. यासाठी सरकारने शहरी भागातील मोठ-मोठ्या सोसायट्यांमध्ये जाऊन शेतकरी ते ग्राहक तत्त्वावर विक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
लॉकडाऊनमुळे उन्हाळी बहरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. वर्षभराची पुंजी यात गेली आहे. सीताफळांची विक्री शहरात करण्यासाठी सुलभ प्रक्रिया राबवली गेली, तरच शेतकरी यातून उभारी घेणार आहे.
– रामचंद्र खेडेकर, सीताफळ उत्पादक, गुऱ्होळी