पिंपरी – लग्न ठरत नसल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. 13) दुपारी चऱ्होली येथे घडली.सागर विनायक बैतुले (वय 30, रा. गोफणे बिल्डींग, आळंदी रोड, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
सागर याचे चऱ्होली फाटा येथे गजानन गॅरेज नावाचे दुचाकी दुरूस्तीचे दुकान आहे. या गॅरेजमध्ये त्याने शनिवारी दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेतला. सागर याला त्वरीत यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
सागर याचे लग्न ठरत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून तो अस्वस्थ होता. त्याच्या मोठ्याचा भावाचाही विवाह झालेला नाही. यामुळे मोठ्या भावाने आधी तुझे लग्न करू, असेही सागर याला कुटुंबीयांनी सांगितले होते. लॉकडाऊन होण्यापूर्वी त्याने अमरावती येथील अंजनगावी जाऊन आपल्या काकांच्या मदतीने मुलगीही पाहिली होती. मात्र मुलीकडून नकार आल्यानंतर त्यास आणखी नैराश्य आले. याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता त्याच्या भावाने व्यक्त केली.