मी राजधानी दिल्लीत असताना पुण्यातल्या ज्या कलाकारांच्याबद्दल नेहमी वाचनात यायचं (कारण त्या काळात दृक माध्यम नव्हतं) त्यात स्वरुपकुमार, सुहासिनी देशपांडे अशी काही कलावंत मंडळी असत. पण त्या काळात ही मंडळी दुय्यम भूमिकांमध्ये वावरताना दिसत, कधी एखाद्या तमाशाप्रधान वा ग्रामीणबाजाच्या चित्रटात सुहासिनी देशपांडे या अभिनेत्रीचं, खास करून नृत्यप्रधान भूमिकेसाठी नाव आलेलं दिसायचं. पण ते तेवढ्यापुरतंच. त्याच काळात सुहासिनी देशपांडे काय, ज्योती चांदेकर काय, अरुणा भट काय, भारती गोसावी काय अगदी लीला गांधी आणि जयमाला इनामदार, रजनी भट यासुद्धासगळ्या दुय्यम भूमिका करणाऱ्या नायिका म्हणूनच ओळखल्या जात. हळूहळू या मधली प्रत्येक दुय्यम भूमिका करणारी मुख्य नायिका होत गेली.
एक गोष्ट या ठिकाणी मुद्दाम नमूद करायला हवी की, या अशा प्रकारच्या दुय्यम भूमिका करणाऱ्या स्त्री-पुरुष कलावंतांनी पुण्याचीच काय; परंतु महाराष्ट्राची रंगभूमी सतत जागती ठेवली. या रंगभूमीला स्वरुप आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
आण्णा कोठावले या नावाचे एक नाट्य-निर्माते मला भेटायला माझ्या घरी आले. तेव्हा मी “सेनापती बापट’ मार्गावर “तीज’ नावाच्या सोसायटीत रहात होतो. कोठावळे यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी होत्या. ते उभयता माझ्या घरी येऊन मला म्हणाले, “”सर, मी एक नाट्यनिर्माता आहे. पण अनेकांच्याकडून मी फसवलो गेलो आहे. लुबाडलो गेलो आहे. या क्षेत्रातल्या काही लोकांनी “तुम्ही मला मदत करू शकाल’ असं मला सांगितले.
खरं तर मी तसं तुम्हाला ओळखतही नाही. पण, मी एक नवीन नाटक करतो आहे, त्याचं नाव आहे “सासुबाईंचं असंच असतं’. त्यात तुम्ही भूमिका करून मला मदत करू शकाल. असं त्या मंडळींनी मला सुचवलं आहे. या नाटकात तुमच्याबरोबर स्वरुपकुमार, सुहासिनी देशपांडे, ज्योत्स्ना पडळकर अशी इतर कलावंत मंडळी आहेत. प्रताप गंगावणे या नवीन लेखकाचं हे नाटक आहे आणि संजय डोळे त्या नाटकाचं दिग्दर्शन करणार आहेत.” मी भूमिकेची लांबी रुंदी वगैरे किंवा व्यवहार याबद्दल विचारणा केली नाही, ही सारी माणसंही तशी मला नवीनच होती. अर्थात ती मात्र या व्यवसायात खूप वर्षं कार्यरत होती. मी, बरं, करीन काम एवढंच म्हटलं आणि त्या भेटीत सुहासिनी देशपांडे हे नाव प्रथम माझ्या कानावर ठसठशीतपणे पडलं.
या नाटकाचे मी दोनशे पेक्षा जास्त प्रयोग केले आणि त्या दोनशे प्रयोगांच्या निमित्तानं मला अभिनेत्री आणि माणूस म्हणून सुहासिनी देशपांडे समजल्या पुण्यामध्ये स्वरुपकुमार काय की सुहासिनी देशपांडे काय दोघांचंही नाव खूप मोठं आहे. संजय डोळे यांचंही नाव दिग्दर्शक म्हणून मोठं आहे. प्रताप गंगावणे हे त्या काळात तसे नवखे होते. परंतु, आजमितीला या नाटककाराच्या नावानं दोनशेच्या आसपास चित्रपट आणि शंभरच्या आसपास चित्रवाणी मालिकांचं लेखन जमा आहे. पण “सासूबाई’ या नाटकाच्या निमित्तानं त्या नाटकातल्या साऱ्या टीमचाच अगदी वेगळ्या प्रकारचा अनुभव आला. त्या नाटकाच्या तालमी पुण्यातल्या शनिवार पेठेतल्या “गोवर्धन कार्यालय’ या ठिकाणी होत. त्या तालमींच्या वेळी अत्यंत वक्तशीर येणारी कलावती म्हणून सुहासिनी देशपांडे ही कलावती माझ्या कायम स्मरणात राहिली.
चोख पाठांतरासाठीही त्या कायम लक्षात राहतील. परंतु, कधी कधी त्या नको तितक्या स्पष्ट वक्त्या किंबहुना फटकळ वाटत. पण ते त्या त्या क्षणापुरतंच असायचं. नाटकाचा प्रयोग ठरवताना निर्माता साऱ्या कलाकारांना विचारून आणि त्यांची उपलब्धता बघून प्रयोग ठरवील ही अपेक्षा करणं तसं चूकच. कारण सर्वांची सोय बघून प्रयोग ठरवणं हे खरोखरीच अवघड. पण तसं निर्मात्यानं करावं अशी कलावंत तंत्रज्ञ यांची अपेक्षा आणि त्यावरून कलावंत आणि निर्माता यात होणारे वाद हे केवळ पुण्यातच नव्हे, तर मुंबईतसुद्धा बघायला मिळायचे. त्यावेळी अनेकदा सुहासिनी यांचं रौद्ररूप बघायला मिळायचं. एरवी त्या शांत, मनमिळावू असायच्या. तालमीमधला त्यांचा वावर अत्यंत शिस्तशीर असायचा. कपड्यांचं मॅचिंग उत्तम असायचं. आपण नटी आहोत म्हणून वेड्यावाकड्या फॅशन करून आलेलं मी तरी त्यांना कधी तालमीत वा अन्यत्रसुद्धा कधी बघितलं नाही. तसंच उगाचच अघळपघळ बोलताना त्या कधीच दिसायच्या नाहीत.
एकदाच फक्त असं घडलं की, त्यांचं वागणं मला पटलं नाही. त्या काळात माझे आणि दूरदर्शनचे चांगले संबंध होते (नोकरी सोडल्यानंतर सुद्धा). तिथल्या कर्मचाऱ्यांचा त्यांच्या काही मागण्यांसाठी संप सुरू होता. त्यात निर्माते कोठावळे यांची इच्छा होती की “सासूबाई’ या नाटकाचं “नाट्यावलोकन’ व्हावं. त्या काळात “नाट्यावलोकन’ या कार्यक्रमात नाटकातले काही प्रवेश दाखवले गेले, शिवाय नाटकाबाबत चर्चा झाली की, नाटक “स्व’ व्हायला मदत व्हायची. तसं मी संबंधित अधिकाऱ्याशी बोललो. त्यानं संपाची बाब थोडीशी बाजूला ठेवून मुद्दाम पुण्यात येऊन “सासूबाई’ नाटकाचं आवश्यक ते चित्रीकरण केलं. त्याबद्दल कलावंतांनी आणि निर्मात्यानं सुद्धा कृतज्ञता दाखवावी माझी रास्त अपेक्षा होती. चित्रिकरणाचा इतका प्रचंड अनुभव पाठीशी असणाऱ्या सुहासिनी देशंपाडे का कुणास ठाऊक पण एकदम त्या चित्रीकरणाच्या वेळी त्या मंडळींच्या देखत मोठ्यांदा बोलून गेल्या, “अहो आम्हाला काय कौतुक आहे या शूटिंगचं!’ मला एकदम खूप वाईट वाटलं. पण त्यांच्या गावीही नव्हतं की, “आपण असं बोलायला नको होतं.’ कारण त्यांच्या दृष्टीनं त्यांचं म्हणणं बरोबरच होतं. कारण दररोजच शूटिंग करणाऱ्या (भले ते दुय्यम भूमिकांसाठी का असेना) सुहासिनीबाईंना त्याचं कौतुक नव्हतं हे खरं. परंतु संप असताना दूरदर्शनच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांनी ते चित्रीकरण मुद्दाम पुण्यात येऊन करावं याचं मला स्वतःला खूप विशेष वाटलेलं होतं. या एका, म्हटलं तर छोट्या, म्हटलं तर माझ्या दृष्टीनं मोठ्या, असणाऱ्या प्रसंगामुळं ते नाटक मी सोडलं. मला वाटलं होतं सुहासिनींसारख्या संवेदनशील कलावतीला त्याबद्दल काही वाटेल. “आपण असं बोलायला नको होतं’ असं तरी किमान त्यांना वाटेल. निर्मात्याला त्याबद्दल खंत वाटेल. पण कुणालाच काही वाटत नाही हे लक्षात आल्यावर मी त्या नाटकातून बाहेर पडलो. त्याबद्दलही कुणी खेद वगैरे व्यक्त केल्याचं मला कळलं नाही.
या नाटकाचे पुढे 2000 प्रयोग होण्यात आणि त्याचे महोत्सवी प्रयोग सादर होऊन त्याप्रसंगी कधी सुलभा देशपांडे, कधी ललिता पवार अशा अनेक मोठ्या व्यक्ती त्या समारंभासाठी आणण्यात माझ्या त्यांच्या बरोबरच्या परिचयाचा किंवा मान्यवर नाटककार जयवंत दळवी यांच्यासारख्याकडून “हे नाटक आई रिटायर होतेय’ या नाटकाच्या तोडीचं नाटक आहे असं पत्र आणवून ते जाहिरातीत वापरताना माझ्यासारख्याचा केवळ वापर केला गेला ही खंत मला आजही टोचते. वेदना देते. असो.
तरीसुद्धा सुहासिनी देशपांडे या अभिनयाचे चौघडे वाजवण्याइतक्या मोठ्या अभिनेत्री आहेत हे मान्यच करायला हवं. स्वतःच्या अभिनयाच्या ताकदीवर या कलावतीनं “एकांडे शिलेदार’ म्हणून आपली अभिनय कौशल्यं पणाला लावून आपल्या दोन्ही मुलांना शिकवून आपल्या पायावर उभं केलं. आज सत्तरीत असणारी ही कलावती मजल दर मजल करीत काही पुरस्कार आणि पारितोषिकं मिळवता मिळवता आजच्या या मुक्कामावर पोहोचली आहे. त्यांचं सर्वात गाजलेलं नाटक हे “सासूबाईंचं असंच असतं!’ हे जरी असलं तरी त्यांनी आजवर जयवंत वालावालकर यांच्या “बहुरुपी व्यवस्था’, या कंपनीचं “बेलभंडार’, सारखं नाटक केलं. त्याचबरोबर “सूनबाई घर तुझंच आहे’, “चिरंजीव आईस…’, “राजकारण गेलं चुलीत’ इत्यादी सुमारे पस्तीस नाटकांमधून भूमिका केलेल्या आहेत. अरुण सरनाईक, शरद तळवलकर, डॉ. श्रीराम लागू, उषा चव्हाण, निळू फुले, सरला येवलेकर असे त्यांचे सहकलाकार होते. “अवंतिका’, “सोनियाचा उंबरठा’, “सप्तपदी’, “अर्धांगिनी’ अशा काही चित्रवाणी मालिकांमधून अभिनय करून त्यांनी छोटा पडदाही आपल्या अभिनय सामर्थ्यानं गाजवलेला आहे. “प्रभात कंपनी’च्या काळापासून भूमिका करणाऱ्या सुहासिनी देशपांडे या आपल्याला अलका कुबल आणि उषा नाडकर्णी यांच्यासारख्या अनेक मान्यवर कलाकारांच्या बरोबर “देवकीनंदन गोपाळा’, “माहेरचा आहेर’, “सासर माझं भाग्याचं’, “सुहासिनीची सत्वपरीक्षा’ इत्यादी सुमारे शंभर चित्रपटांतून लहान-मोठ्या भूमिका करताना दिसल्या आहेत. आजही त्या रंगमंचावर काय की रजतपटावर काय वावरताना दिसतात. सारं आपल्या मनाजोगं करता आलं यासारखा आनंद नाही. शेवटी “सुख म्हणजे नक्की काय असतं…’ हेच खरं ना!
डॉ. विश्वास मेहेंदळे