कोल्हापूर – मागील हंगामात ज्या कारखान्यांनी ऊसाला प्रतिटन तीन हजारांच्या आतमध्ये दर दिला आहे, त्यांनी 100 रुपये आणि 3 हजार रुपयांपेक्षा जास्त दर देणाऱ्या कारखान्यांनी मागील हंगामातील 50 रुपये अतिरिक्त देण्यास जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी संमती दर्शवली. त्यामुळे ऊस दराबाबत सुरू असलेली कोंडी गुरूवारी ( 23 नोव्हेंबर ) फुटली आहे.
ऊस दराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरूवार सकाळपासून पुणे-बंगळुरू महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले होते. हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. हा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे.
मागील हंगामासाठी ऊसाला प्रति टन 400 रूपये आणि यावर्षी एकरकमी साडेतीन हजार रुपये उचल मिळावी अशी मागणी स्वाभिनामी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली होती.
याबाबत जिल्हा पातळीवर तीन बैठका झाल्या होत्या. तर बुधवारी ( 22 नोव्हेंबर ) सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊनही तोडगा निघाला नाही.
गुरूवारी राजू शेट्टी यांनी पुणे-बंगळुरू महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेमध्ये चर्चा झाली. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला.
यामुळे उद्यापासून गेले तीन आठवडे थांबलेले ऊस गाळप सुरू होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिवाळीचे भेट मिळाली आहे. तर, साखर कारखानदारांनी समाधानाचा सुस्कारा सोडला आहे.