औरंगाबाद – गतवर्षी देशात कमी पाऊस झाल्याने अनेक राज्यात दुष्काळ पडला. याउलट महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्याचा परिणाम राज्यातील उसाच्या उत्पादनावर झाला. त्यामुळे महाराष्ट्रातील साखर उत्पादनात घट झाली आहे. महाराष्ट्रातील साखरेचे उत्पादन 2021-22 मधील 137.28 लाख टनांवरून चालू गळीत हंगाम 2022-23 मध्ये 124 लाख टनांपर्यंत घसरले आहे.
गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या लाखो हेक्टर जमिनीवरील पिकांची नासाडी झाली. ज्याचा राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. संततधार पावसामुळे माती बराच काळ ओली राहिल्याने परिणाम ऊस पिकावर झाला. चालू गाळप हंगाम सुरू झाल्यावर आम्ही 138 लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. आता ते 124 लाख टन एवढेच होईल, असा अंदाज आहे. आम्ही केंद्र सरकारला उत्पादनाच्या सुधारित आकडेवारीची माहिती दिली आहे, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी म्हटले आहे.
कारखान्यांचाही आडमुठेपणा
उस उत्पादक पट्टा असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात उसतोडणी कामगारांच्या तुटवड्यामुळे व त्यात आवक वाढल्याने अनेक कारखान्यांनी ऊस घेण्यास नकार दिला. साखर कारखान्यांच्या आठमुठेपणामुळे शेतकऱ्यांना ऊस कारखान्याला घालण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. ज्याचा परिणामही ऊसाच्या उत्पादकतेवर झाला. अनेक शेतकऱ्यांनी या मनस्तापामुळे उसापेक्षा कापूस बरा असे भूमिका घेत अन्य पिक उत्पादनाला भर दिला आहे.
199 साखर कारखाने सुरू
एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत गळीत हंगाम लवकर संपेल. गेल्या गळीत हंगामात कारखान्यांनी पावसाळा सुरू होईपर्यंत काम केले होते. आता एप्रिलच्या अखेरीस ते संपेल. सध्या महाराष्ट्रात 199 कारखाने सुरू आहेत. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील गाळप मार्चअखेर आणि मराठवाड्यातील कारखान्यांचे एप्रिल अखेरपर्यंत गाळप पूर्ण होईल, असे ते म्हणाले.