नवी दिल्ली – साखरेचे दर सप्टेंबर महिन्यात 48 रुपये किलोपर्यंत गेले आहेत. मागील दीड महिन्यांत साखरेच्या दरात चार रुपयांची वाढ झाली आहे. सध्या साखरेचे दर हे 37 हजार 760 रुपये प्रति टनापर्यंत वाढले आहेत. ऑक्टोबर 2017 नंतरचे हे सर्वोच्च दर आहे.
साखरेच्या दरात वाढ झाल्यानंतर व्यापारी आणि उत्पादकांनी चिंता व्यक्त केली जात आहे. कारण देशातील प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकचा नंबर लागतो. या दोन्ही राज्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, त्याचा परिणाम ऊस उत्पादनावर होण्याची शक्यता असल्याचे व्यापारी आणि उत्पादकांचे म्हणणे आहे.
जूनमध्ये किरकोळ बाजारात साखरेचे दर हे 42 रुपये किलो होते. तर जुलै आणि ऑगस्टमध्ये हे दर 44 रुपयांवर गेले होते. तर आता चालू सप्टेंबर महिन्यात साखरेचे दर हे 48 रुपये किलोपर्यंत गेले आहेत. मागील दीड महिन्यात साखरेच्या दरात चार रुपयांची वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता बॉम्बे शुगर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केली आहे.
निर्यातीवर बंदी घालण्याची शक्यता
साखरेचे दर असेच वाढत राहिले, तर केंद्र सरकार साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णयही घेऊ शकते असे तज्ज्ञांचे मत आहे. निर्यातबंदी केल्यास देशांतर्गत बाजारात साखरेच्या किंमती कमी करता येतील. साखरेचा साठा कमी होत असल्याने येत्या काही महिन्यांत साखरेचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन सरकार गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने शेतीमालाचे दर पाडण्यासाठी निर्णय घेत आहे. यामध्ये टोमॅटो, कांदा, तांदूळ या शेतमाल उत्पादकांना फटका बसला आहे. आता साखरेचे भाव पाडण्यासाठी साखरेवर साठे मर्यादा (स्टॉक लिमिट) लावण्याच्या हालचाली सरकारी पातळीवर सुरू झाल्या आहेत.