मुंबई – विषम पर्जन्यमानामुळे महाराष्ट्रात साखरेच्या लागवडीखालील क्षेत्र 14.37 लाख हेक्टर इतके कायम राहणार असले तरी साखरेचा उतारा गेल्या वर्षाच्या 11.25 टक्क्यावरून कमी होऊन दहा टक्के होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत साखरेचे उत्पादन काही प्रमाणात कमी होऊन 74.95 लाख टन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात साखरेच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
असे झाले तर केंद्र सरकार निर्यातीला मर्यादा घालण्याचा हस्तक्षेप करू शकते. 2022-23 या वर्षात साखरेचे उत्पादन 17 टक्क्यांनी कमी झाले होते. पुन्हा सलग दुसऱ्या वर्षी या उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रात 94.95 लाख टन साखरेपैकी 15 लाख टन साखर इथेनॉलसाठी पुरविली जाणार आहे. जर पाऊस फारच कमी पडला तर साखरेचे उत्पादन 94 लाख टनाऐवजी 90 लाख टनापर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत हा प्रश्न आणखी गंभीर रुप धारण करू शकेल. जून महिन्यात उशिरा पाऊस पडल्यामुळे साखरेच्या उत्पादनावर परिणाम झाला होता. त्यातच ऑगस्ट महिन्यात तीन आठवड्यापासून पाऊस पडलेला नाही. याचा उसाच्या उत्पादनावर परिणाम शक्य आहे. टोमॅटो आणि कांद्याच्या किमती वाढू नये यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करून निर्यातीला मर्यादा घातल्या आहेत. अशा प्रकारचा हस्तक्षेप साखरेच्या बाबतीतही केला जाऊ शकतो असे विश्लेषकांनी सांगितले.
महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकमध्ये उसाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत राष्ट्रीय पातळीवरील उत्पादन केवळ 330 लाख टन होऊ शकते. गेल्या वर्षाच्या उत्पादनापेक्षा हे उत्पादन 56 लाख टनाने कमी होईल. देश पातळीवर यातील 50 लाख टन इथेनॉलसाठी पुरवावे लागणार आहे.
किती दरवाढ शक्य
भारताला दरवर्षी साधारणपणे 275 लाख टन साखर लागते. गेल्या वर्षाची उरलेली 65 लाख टन साखर आहे. त्यामुळे फार मोठा तुटवडा निर्माण होणार नाही असे काही विश्लेषकांनी सांगितले. फार तर तीन महिन्यात घाऊक साखरेचा दर 3,100 रुपये प्रतिक्विंटल वरून 3,500 रुपये प्रत्येक क्विंटलपर्यंत वाढू शकतो. यापेक्षा जास्त दरवाढ होणार नाही असे काही विश्लेषकांना वाटते