मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पाचे वर्णन “खोदा पहाड, निकला चुहा’ असे करावे लागेल, अशी टीका माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
हा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेला भ्रमीत करणारा दिशाहीन अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्प सादर करण्याआधी अर्थमंत्री अजीत पवार यांनी त्यांचेच 2017 मधील भाषण वाचयला हवे होते. अर्थमंत्र्यांनी केंद्र सरकारकडून 8 हजार कोटी रुपये कमी आल्याचे सांगितले. मात्र केंद्राकडून वाढीव स्वरूपात आलेल्या 17 हजार कोटीच्या अनुदानाची गोष्ट सांगण्यास ते सोईस्कररित्या विसरले.
अर्थमंत्र्यांनी 31 हजार 343 कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प सादर करत मंदी असल्याचे कारण पुढे केले आहे. मात्र यावर उपाययोजना सांगितल्या नाही. फक्त अधिकाऱ्यांनी लिहून दिलेला अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी वाचून दाखविल्याने राज्याला दिशा तर दिली नाही. मात्र राज्याची दिशाभूल केली आहे, आरोप मुनगंटीवार यांनी केला.