- गतवर्षीचा आणि आजचा पाणीसाठा तंतोतत सारखा
- दोन दिवस झालेल्या पावसाने वाढविली पातळी
पिंपरी – जून महिन्यात पडून गेल्यानंतर पावसाने हुलकावणी देण्यास सुरुवात केली होती. यामुळे शहराला आणि मावळ तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणी साठ्यात वाढ होत नव्हती. परंतु गेल्या तीन ते चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. योगायोग म्हणजे 13 जुलै रोजी असलेला पाणीसाठा अगदी गेल्यावर्षी 13 जुलै 2020 इतकाच झाला आहे. गेल्या वर्षी देखील 13 जुलै रोजी 33.60 इतका पाणीसाठा पवना धरणात होता. यंदाही आजच्याच दिवशी इतकाच पाणीसाठा धरणात आहे.
पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून पाणी पुरवठा होत आहे. तसेच मावळातील शेतीही पवना नदीतील पाण्यावर अवलंबून असते. यामळे धरण कधी भरते, याकडे मावळ तालुक्यातील शेतकरी आणि पिंपरी चिंचवड शहरवासियांचे लक्ष लागलेले असते. दरवर्षी 15 ऑगस्टच्या आसपास पवना धरण 100 टक्के भरते. यंदाच्यावर्षी पवना धरण परिसरात आत्तापर्यंत 625 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर गेल्यावर्षी आजच्याच दिवसापर्यंत 410 मिलिमीटर पाऊस झाला होता. मात्र गेल्यावर्षी आणि यंदाच्यावर्षी आजच्या दिवशी पवना धरणात 33.60 इतका पाणीसाठा असल्याने हा योगायोग झाला आहे. यंदाच्यावर्षी जून महिन्यात सुरुवातीच्या दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात सुमारे साडेतीन टक्क्यांनी वाढ झाली होती. मात्र त्यानंतर जून अखेरीस पावसाने दडी मारली. त्यामुळे धरणातील पाणीसाठी दीड टक्क्यांनी कमी होऊन 1 जूनपासून 2.01 टक्के इतका पाणीसाठा वाढला आहे. तर मंगळवारी पवना धरण परिसरात 51 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून मंगळवारी गेल्या 24 तासांत धरणातील पाणीसाठ्यात 0.17 टक्के इतका पाणीसाठा वाढला आहे.