नवी दिल्ली – करोनाविरोधी लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारने आज 45 वर्षांवरील सर्वांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला. 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वजण कोविड-19 विरोधी लसीकरणाला पात्र असतील. त्यामुळे अशा सर्वांनी लसीकरणासाठीची आपली नोंदणी करावी, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील निर्णय घेण्यात आला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. वयाची 45 वर्षे पूर्ण केलेल्या आणि अन्य कोणतेही आजार नसलेल्या कोणालाही ही लस घेता येऊ शकेल, असे जावडेकर म्हणाले. या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली होती.
लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा पूर्वी चार ते सहा आठवड्यांमध्ये घेता येऊ शकणार होता. तो डोस आता चार ते आठ आठवड्यांदरम्यान डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतला जाऊ शकेल, असा निर्णयही केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला असल्याचे जावडेकर म्हणाले. चार ते आठ आठवड्यांदरम्यान दुसरा डोस घेतल्यास त्याचे अधिक चांगले परिणाम मिळत असल्याचे संशोधकांचे म्हणणे असल्याने असा निर्णय घेतल्याचे जावडेकर यांनी सांगितले.
करोना विरोधी लसीकरणामुळे देशभरात वेगाने आणि चांगली प्रगती झाली आहे. या लसीकरण प्रक्रियेबाबतही केंद्रीय मंत्रिमंडळाने चर्चा केली. आता 1 एप्रिलपासून वयाची 45 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींना लसीकरण करता येईल, असा निर्णय घेण्यात आल्याचे जावडेकर म्हणाले.
आतापर्यंत 4.85 कोटी नागरिकांना कोविड-19 विरोधी लसीकरण करण्यात आले आहे. गेल्या 24 तासात 32 लाख जणांना लस देण्यात आली आहे. देशभरात लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत आणि लसीची कोणतीही कमतरता नाही. लसीचा पुरवठा करण्याची यंत्रणा व्यवस्थित आहे. त्यामुळे नागरिकांनी लस घेण्यासाठी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जावडेकर यांनी केले. आजच्या निर्णयामुळे लसीकरणाचा वेग वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोविड-19 चे रुग्ण वाढत असलेल्या काही राज्यांमध्ये आरोग्य सुविधांच्या व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने पाठपुरावा केल जात आहे. लसीकरणाला वेग मिळाल्यामुळे विषाणूच्या प्रादुर्भावाचा वेग आटोक्यात राखण्यात यश येईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
पंजाबमधील 80 टक्के रुग्णांमध्ये ब्रिटनमधील विषाणूचा प्रकार आढळला आहे. करोनाच विषाणू नवीन प्रकारात सापडत आहे. त्यामुळेच लसीकरण करून घेणे खूप महतवचे आहे. करोनाच्या विषाणूपासून बचाव करण्यासाठी मास्कचा सततचा वापर, सामाजिक अंतर कायम राखणे आणि हात वारंवार धुणेही महत्वाचे आहे. मात्र लसीकरण हे विषाणूपासून वाचण्याचे कवच आहे, असे जावडेकर म्हणाले.