श्रीकांत कात्रे
करोनाच्या काळात मुंबईवरून गावी आल्यावर शेती करताना आरोग्यदायी उत्पादन घेण्याचे कविता सातळकर यांनी ठरविले. गांडूळ खताची निर्मिती करून नैसर्गिक शेती करण्याचे निश्चित केले. पिकांमध्ये विविध प्रकारच्या डाळींचे उत्पादनही नैसर्गिक पद्धतीने करून जात्यावर तयार केलेल्या डाळी लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांना लोकांमध्ये जागृतीही करावी लागली. पण चिकाटी दाखवत त्यांनी या व्यवसायाला चालना दिली. पुणे- मुंबईसारख्या शहरांमधूनही प्रतिसाद मिळू लागल्याने त्या व्यवसायात स्थिर झाल्या. आपल्याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांनीही केमिकलविरहित नैसर्गिक उत्पादन घेण्यासाठी त्या प्रवृत्त करू लागल्या. काही महिलांनाही त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला.
नैसर्गिक, जात्यावरील डाळींच्या व्यवसायातून कविता सातळकर यांनी निवडली वेगळी वाट करोनाचा काळ सर्वांसाठीच संकटाचा काळ होता. त्या काळात आरोग्य जपण्याचे महत्त्व लक्षात आले. पतीसह मुंबईत दहा वर्षांपासून राहणाऱ्या कविता सातळकर यांनाही लॉकडाऊनमध्ये गावी लातूरकडे यावे लागले. घरच्या शेतीतच राबण्याचे या दाम्पत्याने निश्चित केले. मुलगी लहान असल्याने तिच्यासाठी ऑरगॅनिक नैसर्गिक उत्पादनाचा उपयोग करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. ते करतानाच शेतीचे उत्पादनच केमिकलविरहित करण्याचे त्यांनी ठरविले. कविता यांनी त्यादृष्टीने अभ्यासपूर्वक हालचाली सुरू केल्या. गांडूळ खताचा प्रकल्प सुरू केला. ऑरगॅनिक उत्पादन घ्यायचे म्हणजे उत्पादन कमी मिळते. आणि या उत्पादनाची किंमतही अधिक असते. केमिकलच्या वापरामुळे उत्पादन चांगले मिळते. त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांचा भर रासायनिक घटकांचा वापर करण्यावर अधिक असतो. हे लक्षात घेऊन सर्वसामान्य शेतकरी सेंद्रिय शेती करण्याचा विचार करत नाही.
अशा वातावरणात वेगळ्या विचाराची अंमलबजावणी करण्याचे कविता यांनी निश्चित केले. लातूरपासून पुढे नळेगाव तालुक्यातील येलमवाडी येथील त्यांच्या शेतीमध्ये डाळींचे उत्पादन सुरू केले. हा भाग तसा दुष्काळीच. ज्वारीसारखे पीक यायचे. मग यांनी त्याबरोबर तूर, हरभरा, मूग, उडीद अशा डाळी घेण्यास सुरवात केली. डाळीमध्ये प्रोटिन्स अधिक असतात. त्यामुळे आरोग्यासाठी डाळीचे महत्त्व मोठे असते. मात्र, केमिकलयुक्त किंवा पॉलिश्ड डाळींपेक्षा अनपॉलिश्ड आणि केमिकलविरहित डाळी अधिक उपयुक्त ठरतात, हे महत्त्व त्यांना पटवून देण्यासाठी खूप वेळ द्यावा लागला. त्यासाठी मग डाळी जात्यावर भरडून घेण्याची प्रक्रिया करावी लागते. शेतातून डाळ आणल्यानंतर ती तीन- चार तास भिजवून ठेवावी लागते. मग रात्रभर पोत्यात घालून ठेवावी लागते. दुसऱ्या दिवशी ती जात्यातून भरडून काढायची.
पुन्हा एकदा अशीच प्रक्रिया करायची. मग डाळ झाकून ठेवून नंतर उन्हात ठेवायची. या नैसर्गिकरित्या उत्पादित केमिकलविरहित ऑरगॅनिक डाळीचे महत्त्व पटल्यामुळे अशा डाळींची मागणी वाढती आहे, असे त्यांनी सांगितले. जात्यावर डाळी तयार करण्यासाठी पाच- सहा महिलांची त्यांना मदत घ्यावी लागते. या कामासाठी त्या महिलांना रोजगारही मिळू लागला. त्यामुळे कविता यांनी स्वतःचा व्यवसाय स्थिर करताना इतर महिलांनाही स्वावलंबी बनविण्यासाठी मदत केली आहे. लातूरमध्ये माणदेशी फाउंडेशनच्या कामाची माहिती त्यांना मिळाली. महिलांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांमुळे त्या माणदेशीशी जोडल्या गेल्या. त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळत गेले. कविता यांनी आर्या ऑरगॅनिक म्हणून फर्म स्थापन केली. त्याद्वारे नैसर्गिकरित्या तयार केलेल्या जात्यावरील डाळींची तसेच गांडूळ खतांची विक्री होऊ लागली. माणदेशीच्या मुंबईतील महोत्सवात या डाळींना मागणी
मिळाली. तेव्हापासून शहरातील लोक ऑनलाइन मागणी नोंदवू लागले. वेगळी चव, रूचकर आणि लवकर शिजणारी गावरान डाळ लोकांना आवडू लागली. ऑनलाइन शॉपिंग वाढू लागले. डाळीतील प्रोटिन महत्त्वाचे असते. त्यामुळेच आपल्याकडे रोजच्या आहारात डाळीचा उपयोग होत असतो. त्यातही अशी जात्यावरची अनपॉलिश्ड डाळ अधिक आरोग्यदायी ठरते, असे त्यांनी सांगितले. हा व्यवसाय करण्यापूर्वी मुबईत कविता यांनी पार्लरचा कोर्स पूर्ण करून प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणूनही काम केले होते. आता डाळींचा व्यवसाय करताना मार्केटिंगची जबाबदारी त्या पूर्णपणे सांभाळतात. शेतीमधील उत्पादनाची जबाबदारी पती घेतात. जात्यावरील डाळी तयार करण्यासाठी त्यांना त्यांच्या सासूबाईंचीही मदत होते. वेगवेगळ्या डाळींचे उत्पादन वर्षभर वेगवेगळ्या वेळी हंगामानुसार होत राहते.
त्यामुळे हा व्यवसाय वर्षभर सुरू राहतो. लोकांना कमीत कमी किंमतीमध्ये उत्पादन पुरविण्याचे ध्येय ठेवून त्या काम करत आहेत. दीडशे किलो डाळींचे उत्पादन वर्षभरात होते. मात्र, आता त्या इतर शेतकऱ्यांनाही अशा प्रकारच्या नैसर्गिक डाळींचे उत्पादन घेण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत. केमिकलव्यतिरिक्त मधासह विविध प्रकारची उत्पादने घेण्याचेही त्यांचे प्रयत्न आहेत. त्यादृष्टीने संशोधनावरही त्यांनी भर दिला आहे. संकट ही संधी असे समजून करोना काळात मिळालेल्या आरोग्यदायी विचाराच्या बळावर कविता यांनी वेगळी वाट निवडली. त्या वाटेवरील आव्हाने पेलततत्या पुढे जात आहेत. त्यामुळेच त्यांचे काम इतरांसाठीही प्रेरणादायीच ठरले आहे.