वाघोली – नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ‘राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020’ चा अंतिम निकाल 31मे रोजी जाहीर झाला असून यामध्ये पुणे जिल्ह्यातील अष्टापूर( ता.हवेली) येथील सोनुल आण्णासो कोतवाल याची सहायक प्रकल्प अधिकारी पदावर निवड झाली आहे.
सोनुलचा राज्यसेवा परीक्षेचा हा दुसरा प्रयत्न होता. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अष्टापूर सारख्या ग्रामीण भागातून येणारा सोनुल हा मेकॅनिकल इंजिनियर असून त्याने M.B.A Manufacturing मध्ये पदव्युत्तर पदवी मिळविली आहे. 2 वर्ष कंपनीत नोकरी करून स्पर्धा परीक्षा ध्यासासाठी नोकरी सोडली.
उच्चशिक्षित सोनुलचे वडील शेतकरी आहेत. तर आई गृहीणी आहे. पत्नी व 2 मुले अशी कौटुंबिक जबाबदारी असतानाही त्याने हे यश मिळवले. विशेष बाब म्हणजे नोकरीस लागलेल्या आपल्या मित्रास मुंबईला जायचे असल्याने त्याला पुणे रेल्वे स्टेशनवर सोडण्यास निघालेल्या सोनुलच्या मोटारसायकलला विरुद्ध बाजूने येणारी ट्रक 22 मार्च 2022 रोजी धडकली.
हा अपघात एवढा भयंकर होता की यात सोनुलचा उजवा पाय गुडघ्याच्यावरून कापावा लागला. अशा कायमस्वरूपी पाय गमावलेल्या परिस्थितीत महिन्यातच असणारी राज्यसेवा मुलाखत त्याने स्ट्रेचरवरूनच दिली व या मुलाखतीत 100 पैकी 70 असे उच्च गुण मिळवून त्याने या पदाला गवसणी घातली.
पदाच्या माध्यमातून दुर्गम ग्रामीण जनतेपर्यंत लोकप्रशासन पोहोचवण्याचे सोनुलचे स्वप्नं आहे. ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षा क्षेत्रात मार्गदर्शन करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. एवढ्यावर न थांबता UPSC चा तो अभ्यास करणार आहे. त्याच्या या यशात कुटुंबीय, मित्र,नातेवाईक अष्टापूर ग्रामस्थ व प्रबोधन भवन पेरणे लोणीकंद येथील स्पर्धा परीक्षा केंद्राचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.