मुंबई – दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात या मागणीसाठी आज ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. नागपूर, औरंगाबाद, मुंबई आणि उस्मानाबादमध्ये काही विद्यार्थी रस्त्यावर उतरले. तसेच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर शेकडो विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे कुणाचं नेतृत्त्व आहे? या विद्यार्थ्यांना कोण भडकवत आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे आता सरकार या दबावाला बळी पडणार का हे पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे.
करोनाची लाट ओसारल्यामुळे शाळा आणि महाविद्यालय पुन्हा सुरू करण्यात येत आहे. एकीकडे पालकांनी शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे, तर दुसरीकडे ऑफलाइन परीक्षा सुरू होणार असल्यामुळे विद्यार्थी चांगलेच संतापले आहे. या विद्यार्थ्यांनी आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेरच जमत जोरदार घोषणाबाजी केली.
बोर्डाचा अभ्यासक्रम ऑनलाईन-ऑफलाईन शिकवत शाळेने जरी पूर्ण केला असला तरी स्वतःला तयारीसाठी आणखी पुरेसा वेळ हवा आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलली तर अभ्यासाची तयारी पूर्ण होईल,असे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. तर परीक्षा वेळापत्रकनुसार झाली तर पुढे परीक्षांचा निकाल, अकरावी प्रवेशप्रक्रिया वेळेत होईल. याशिवाय विद्यार्थ्यांमध्ये कुठल्या प्रकारचे संभ्रमाचे वातावरण राहणार नाही, असे सुद्धा काही पालक आणि विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
नोटीस न देता आंदोलन करण योग्य नाही, काही ठिकाणी मुले आंदोलन करत असली तरी लाखो लोक मेसेज करत आहेत की, परीक्षा घ्या, पण चुकीचा पायंडा पाडायचा नाही. कमी गुणांचा पेपर घेतला जाऊ शकतो का हा विचार करू शकतो, पण परीक्षा घेऊ नये असे होणार नाही, असेही गृहमंत्री म्हणाले.
तसेच मुलांनी रस्त्यावर उतरवणे योग्य नाही. आता हे कुणी केले याची गृहविभाग चौकशी करेल. आंदोलन होत असलेल्या ठिकाणी गर्दी नियंत्रणात आणावी असे आदेश त्या-त्या विभागातल्या पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने लहान मुलांना विद्यार्थ्यांना रस्त्यावर कोणी उतरवले याच्या चौकशीचे आदेशही गृहमंत्र्यांनी दिले.