कराड -स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांनी देशातील पहिल्या सैनिक स्कूलची स्थापना सातारा येथे केली आहे. तसेच स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोपविलेली देशाच्या संरक्षणमंत्री जबाबदारही त्यांनी सक्षमपणे पार पाडली. त्यांचे कार्य या सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेणार्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहचले पाहिजे, असे मत खा.श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.
सातारा सैनिक स्कूल संदर्भात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व शाळा व्यवस्थापन यांची ऑनलाइन बैठक पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, डॉ. अशोकराव कारंडे, झुंजारराव पाटील, सैनिक स्कूलचे प्राचार्य उज्वल घोरपडे, निवृत्त मेजर जनरल विजय पिंगळे, उच्च माध्यमिक शिक्षण विभाग पुणेचे संचालक ए.के.सिंग उपस्थित होते.
खा.श्रीनिवास पाटील म्हणाले, या भूमीचे सुपुत्र स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांचे अनेक क्षेत्रात मोठे कार्य आहे. त्यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीसमोर यायला हवी. चव्हाण साहेबांनी देशातील पहिल्या सैनिक स्कूलची स्थापना सातारा येथे केली. तर देशाचे संरक्षणमंत्री म्हणून देखील त्यांनी आपली जबाबदारी सक्षमपणे संभाळली. त्यांनी दिलेल्या योगदानाची माहिती सैनिक स्कूलमधील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली पाहिजे.
यासाठी त्यांच्या कार्याचा मागोवा घेणारा सचित्र असा धातूच्या स्कल्पचर्सचा देखावा या शाळेत उभारण्यात यावा. तसेच शाळेच्या दर्शनी सुंदर व आकर्षक फलक असावा. त्यानुसार त्यामध्ये बदल करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.