नगर – भारत देश हा सुसंस्कृत देश आहे. या देशामध्ये सर्व नागरिक गुण्यागोविंदाने राहत आहेत. परंतु अलिकडच्या काळामध्ये महिलांवर व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे आपली प्रतिमा मलिन होत आहे. यासाठी महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधामांना कायद्याची धाक बसावी, यासाठी कायद्यामध्ये बदल करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांनी केले.
ह्युमिनीटी केअर फाउंडेशन व मानवता सेवा संस्थेच्यावतीने हाथरस येथील घटेनचा निषेध करण्यात आला, यावेळी डॉ. सागर बोरुडे बोलत होते. तसेच कोपर्डीतील नराधमांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी ऍड. योगेश गेरंगे, महेश पवार, मच्छिंद्रनाथ म्हस्के, पंकज भांबळ, विनोद जोंधळे, आदित्य कानडे, अनिकेत कोळपकर, नितीन गायकवाड, रंजना उकिर्डे, कांचन इंगवले, साधनाताई बोरुडे, हेमलता कांबळे, श्रुतिका दरेकर आदी उपस्थित होते.
डॉ. सागर बोरुडे म्हणाले, समाजामध्ये महिलांचा सन्मान होणे गरजेचे आहे. देशाच्या जडणघडणीमध्ये महिलांचा वाटा मोठा आहे. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रामध्ये आपल्यावरील जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहेत. नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील आरोपींना फाशीची शिक्षा होऊनही कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे गुन्ह्यांत वाढ होत आहे. त्यामुळे महिला सुरक्षितेच्या कायद्यामध्ये बदल करुन ते अधिक कठोर करणे आवश्यक आहे.