मुंबई – राज्यात तब्बल 39 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बुधवारी बदल्या करण्यात आल्या. मात्र, पत्रक काढून 12 तास उलटत नाही तोच पाच अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. अवघ्या काही तासात पोलीस पदोन्नती आदेशाला स्थगिती दिल्यामुळे गृहखात्याचा अजब कारभार समोर आला आहे. तसेच या बदल्यांवरून महाविकास आघाडीमधील मतभेद पुन्हा समोर आले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल तडकाफडकी झालेल्या बदल्यांमध्ये मुंबई आणि ठाण्यातल्या पोलीस अधिक्षक आणि उपायुक्तांसह पाच जणांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती दिली गेली होती. मात्र हा निर्णय घेताना गृहमंत्र्यांनी आपल्याला विश्वासात घेतले नसल्याची तक्रार मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. याबाबत माध्यमात बातमी आल्यानंतर त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना संपर्क करण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर अवघ्या 12 तासांच्या आत मुख्यमंत्र्यांनी या पाच बदल्यांना स्थगिती दिली.
यात महेश पाटील हे मिरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त होते. त्यांना मुंबईतील वाहतूक विभागात अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती. राजेंद्र माने हे मुंबई राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त होते. त्यांची ठाण्यातील पूर्व प्रादेशिक विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली होती.
संजय जाधव हे पुणे सुरक्षा पथक महामार्गाचे पोलीस अधीक्षक होते. त्यांना ठाणे शहर अप्पर पोलीस आयुक्तपदी बदली देण्यात आली होती. पंजाबवराव उगले हे ठाण्यातील लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक होते. त्यांना मुंबईच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती. दत्तात्रय शिंदे हे पालघरचे पोलीस अधीक्षक होते. त्यांना मुंबई संरक्षण आणि सुरक्षा विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती.