-अरुण गोखले
साठवण करायची, संचय करायचा हा तर माणसाचा स्वभावच आहे. अनेक गोष्टी जीवनात मुद्दाम साठवाव्या लागतात, हेही खरे आहे. पण प्रश्न असा आहे की, नेमके काय साठवायचे आणि किती व कसे हे मात्र माणसाला नेमके कळत नाही. तिथेच गल्लत होते. खरं तर जीवनात साठवायच्या असतात त्या सुखाच्या आठवणी, उत्तम गुण, नाना उपायांनी पदरी पडणारे पुण्य, सन्मार्गाने मिळवलेले धन, लाखमोलाची जीवाला जीव देणारी माणसं, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद.
पण प्रत्यक्षात मात्र घडते असे की, आपण जे साठवायला हवे, जपायला हवे तेच साठवत नाही अन् उगाच नको ते दु:ख. मानापमानाचे प्रसंग, झालेले वाद, दु:खाचे प्रसंग, जीवलगांचे वियोग ह्या गोष्टी आठवत बसतो आणि आपणच आपल्या सुखीसमाधानी जीवनातली शांती घालवून बसतो.
खरं तर अनेक नको असणाऱ्या गोष्टीही जीवनात अनेकदा घडत असतात. त्या आपण टाळूही शकत नसतो. पण मग त्या दुःखाला आपण विस्मृतीच्या कप्प्यात का टाकत नाही. आपण ते प्रसंग, घटना, वाद, विसंवाद हा जिथल्या तिथे विसरून का जात नाही. झालं गेलं गंगेला मिळालं, असं म्हणून अनेक गोष्टी वेळच्या वेळी का सोडून देत नाही?
पण आपण तसं करत नाही कारण आपला अहंपणा, अहंकार, गर्व मी म्हणेल तेच खरं ह्याचा आग्रह, हेका ह्या गोष्टीच त्यास कारणीभूत असतात. आपलं मन विसरून जाण्याइतकं उदार, क्षमाशील आणि विशाल नसतं. नको त्या गोष्टीचा गुंताच आपले जीवन निरर्थक करत असते.
जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल, तर नेमकं काय साठवायचं आणि काय विसरायचे, हे कळायला हवं. इथे हितकारी बोध हाच आहे की, साठवा सुखाचे क्षण, आठवा ते मनावर कोरले गेलेली संतवचने, आठवा तो डोळे भरून पाहिलेला निसर्ग, आठवा ते संगीत, तो सुखसंवाद, त्या मनाच्या चोर कप्प्यात ठेवलेल्या मोरपंखी जीवलगांच्या आठवणी.
तुम्ही खऱ्या अर्थाने जीवनात दोन्ही हातांनी, उघड्या डोळ्यांनी आणि विशाल मनाने इतकं सुखसमाधान, आनंद साठवा की त्यापुढे तुमच्या जीवनातले दु:ख त्या समोर कमी पडले पाहिजे.