नगर -आजी-माजी सैनिक व त्यांच्या परिवारावर वारंवार होणारे हल्ले रोखावे व त्यांच्या कुटुंबीयांवरील अन्याय दूर करण्यासाठी प्रशासनाने योग्य कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी अध्यक्ष रामदास गुंड, उपाध्यक्ष सुरेंद्र खेडकर, गोपीनाथ डोंगरे, ईश्वर गपाट, रुबेन कमलोरी, तय्यब बेग, राजू सोनसळे, संजू ढाकणे, संजय ढाकणे, बाळासाहेब नरसाळे, संपत शिरसाट, संतोष पालवे, कृष्णा चौगुले, अण्णासाहेब भापकर, अकबर शेख आदिंसह आजी-माजी सैनिक उपस्थित होते.
राज्यासह जिल्ह्यात आजी-माजी सैनिकांवर हल्ले होण्याचे प्रमाण दिवसंदिवस वाढत आहे. तर त्यांच्या कुटुंबीयांवर अन्याय होत आहे. नुकतीच निवृत्त नैविक अधिकारी मदन शर्मा यांच्यावर हल्ला झाला आहे.
मनोज आवटी या सैनिकांची हत्या, रायगड जिल्ह्यातील स्वर्गीय सैनिक अतुल मांढरे यांच्या वडिलांची हत्या, ठाणे जिल्ह्यात प्रत्यक्ष भारतीय सेनेत कार्यरत सैनिकांना तसेच त्यांच्या परिवारांना मारहाण, पुणे जिल्ह्यात सैनिकांच्या जमिनीवर अतिक्रमण अशा अनेक घटना पुढे येत आहे.
ज्या सैनिकांनी देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली आहे. अशा सैनिकांना स्वतःच्या कुटुंबाचे रक्षण करण्यास अपयश येत आहे. त्यामुळे प्रशासनाने आजी-माजी सैनिकांवर होणारे हल्ले व त्यांच्या कुटुंबीयांवर होणारा अन्याय थांबविण्यासाठी प्रशासनाने कठोर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.