मुंबई – शेअर बाजाराच्या निर्देशांक गेल्या दोन दिवसापासून प्रचंड प्रमाणात कोसळल्यामुळे या दोनच दिवसांत भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचे तब्बल 11.45 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
शुक्रवारी निर्देशांक कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे 4.50 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. आजही शेअर बाजार निर्देशांकांत जवळजवळ तीन टक्क्यांनी घट झाली. या घटनाक्रकामाबाबत जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, गेल्या दोन महिन्यापासून भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक पिछाडीवर आहेत.
अमेरिकेची रिझर्व्ह बॅंक व्याजदरात वाढ करणार आहे. त्यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना अमेरिकेतील गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. या कारणामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून गुंतवणूक काढून घेत असल्यामुळे निर्देशांकावर दबाव येत आहे.
मात्र दहा वर्षांपूर्वी अमेरिकेच्या रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात वाढ केल्यानंतर जो परिणाम झाला होता तेवढा परिणाम आता भारतीय शेअर बाजारावर झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारचे करेक्शन शेअर बाजारात अपेक्षित होते. भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक आवश्यकतेपेक्षा जास्त पातळीवर आहेत, या असा इशारा बऱ्याच ब्रोकरेज संस्थानी या अगोदरच दिला होता. दरम्यानच्या काळात जागतिक पातळीवर करोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे शेअर बाजार गुंतवणुकदार बिथरले आहेत. काही आठवडे तरी शेअर बाजारातील परिस्थिती अस्थिर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.