मुंबई – परदेशातून नकारात्मक संदेश आल्यामुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक अडिच टक्क्यांनी कोसळले. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे मूल्य एकाच दिवसात 6.71 लाख कोटी रुपयांनी कमी झाले.
आता शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य 249 लाख कोटी रुपयापर्यंत आले आहेत. विश्लेषकांनी सांगितले की, शेअर बाजार निर्देशांक कोसळण्यामागे अनेक कारणे आहेत. भारतातील महागाई वाढण्याबरोबरच व्याजदरात वाढ झाली आहे. उत्पादन कमी होत आहे. भारत आयात करीत असलेल्या वस्तूंचे दर अमेरिकेच्या व्याजदर वाढीमुळे आणि रशिया- युक्रेन युद्धामुळे वाढत आहेत. रशिया-युक्रेन युध्द कधी संपेल हे गुंतवणूकदारांना समजेनासे झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये सध्याच्या पातळीवर नफा काढून घेत गुंतवणूकदार जोरदार विक्री करीत आहेत.
अमेरिकेमध्ये महागाई सध्या 40 वर्षाच्या उच्चांकावर आहे. या महागाईचा अमेरिकेबरोबरच जागतिक बाजारावर परिणाम होत असतो. त्यासाठी कसल्याही परिस्थितीमध्ये ही महागाई कमी करणार आहे असे अमेरिकेच्या रिझर्व बॅंकेने सांगितले आहे. अशा परिस्थितीमध्ये अमेरिका आणखी व्याज दरात मोठ्या प्रमाणात वाढ करू शकते. त्यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक काढून घेत आहेत.
त्याचबरोबर भारतातील किरकोळ गुंतवणूकदारही विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. चीनचा शेअर बाजार वगळता जगातील इतर देशातील शेअर बाजाराचे निर्देशांक गुरुवारी मोठ्या प्रमाणात कमी झाले. त्यातच रुपयाचे मूल्य कमी होत असल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळत नसल्याचे दिसून येत आहे. नजीकच्या भविष्यामध्ये या परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता कमी असल्याचे बऱ्याच विश्लेषकांना वाटते.