मुंबई – मुंबई शेअर बाजारासाठी आजचा दिवस हा काळा दिवस ठरला आहे. जवळपास सर्वच शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाली. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 1416 अंकांनी घसरला व 52,792 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही 430 अंकानी म्हणजे 0.65 टक्क्यानी घसरून 15,809 वर पोहोचला.
बॅंक निर्देशांक 884 अंकांनी घसरला तर निफ्टी आयटी निर्देशांकात दोन वर्षातली सर्वात मोठी घसरण झाली. बीएसईची मार्केट कॅप 6 लाख कोटींनी घसरल्याने गुंतवणूकदारांना जोरदार फटका बसला. आज 838 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 2413 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 122 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. मेटल आणि आयटी क्षेत्राला आज मोठा फटका बसला असून त्यांच्या शेअर्समध्ये 4 ते 5 टक्क्यांची घसरण झाली आहे.
जागतिक शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात समभागांची विक्री, गुंतवणूकदारांकडून शेअर बाजारातून पैसे काढून घेण्याचा सपाटा आणि भारतीय शेअर बाजारात झालेली समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री यामुळे आज शेअर बाजार कोसळला आहे.