खेड, शिरूर, आंबेगाव तालुक्यात अपहरण, खुनाची घटना नित्याचीच : पोलीस प्रशासन “कोमात’
पुणे -पुणे जिल्ह्याची औद्योगिक पंढरी असलेल्या चाकण, रांजणगाव गणपती, शिक्रापूर, सणसवाडी येथील वाढत्या गुन्ह्यांमुळे कहरच केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात खंडणीसाठी अपहरण, दिवसाढवळ्या खून, मारहाण, लुटीचा “सिलसिला’ आदी गुन्ह्यांमुळे शिरूर, खेड, आंबेगाव तालुके “कलंकित’ होत आहेत. यावर ग्रामीण पोलीस विभागाकडून वेळीच पायबंद घातला तरच ग्रामीण भागातील जनता सुरक्षित “श्वास’ घेणार आहे.
शिरूर तालुक्यात विशेषत: गेल्या तीन वर्षांत अपहरण करून खून झालेल्यांची संख्या चार झाली आहे. त्यानंतर खेड तालुक्यातून बेपत्ता होण्याची आकडेवारी वाढत आहे. याकडे चाकण पोलीस ठाण्याकडून गांभीर्याने घेतले जात नाही. जिल्ह्यातील औद्योगिक पंढरी असलेल्या चाकण, रांजणगाव औद्योगिक वसाहतीमुळे गेल्या पंधरा वर्षांत “कात’ टाकली आहे. त्यामुळे देशासह परदेशातील बहुराष्ट्रीय कंपन्या दाखल झाल्या. त्यामुळे शेतीव्यवसायात काबाडकष्ट करणारा शेतकरी काही वर्षांत सधन झाला. त्याचबरोबर गुंठेवारी फोफावली. त्यातून वाडवडिलोपार्जित शेती फुकापासरी विकून गुंठामंत्री बनले. शेतीवर तुटपुंजे उत्पन्न मिळविणारा शेतकरी रुबाब मिरवित आहे.
जिल्ह्यातील दोन औद्योगिक वसाहतींची नोंद जागतिक पातळीवर आहे. दर्जेदार आणि नामाकिंत कंपन्यांची उत्पादने चाकण, रांजणगाव गणपती येथे घेतले जाते. त्यामुळे दोन वसाहतींमधून सुमारे दीड ते दोन लाखांवर रोजगारवाटा निर्माण झाल्या आहेत. या दोन वसाहतींमध्ये कामगार ठेका, इतर साहित्य पुरवठा करणारे व्यावसायिक, पूरक व्यवसाय आदींमधून पाच ते दहा कोटी रुपयांची उलाढाल होते.
कंपनीमधून भंगाराच्या ठेक्यावरून कोटींची उलाढाल होत आहे. यातून अनेक ठेकेदारांनी आर्थिकदृष्ट्या बाळसे धरले आहे. या ठेक्याचा वाद अनेकवेळा जीवावर उठला आहे. यातून वाद आणि खून झाले आहेत. या ठेक्यात वर्चस्व आणि अस्तित्वाची झालर असल्यामुळे बऱ्याचवेळा ठेकेदारीवरून सुप्त संघर्ष उफाळून येत आहे. यापूर्वी कंपनीतील व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांना दमदाटी, जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यातून अधिकाऱ्यांचे अपहरण करण्यापर्यंत ठेकेदारांची मजल गेली आहे. त्यामुळे ठेकेदार आणि पोलीस प्रशासन यांच्यातील संबंध जगजाहीर होऊ लागले आहेत. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला तरी पोलीस प्रशासन जुजबी कारवाई करीत आहे.
शिक्रापूर हद्दीत 2017 ते 2020 या कालावधीत चार खून झाले आहेत. यामुळे सधन औद्योगिक पट्टा अशांत बनला आहे. त्याचपाठोपाठ त्याची झळ चाकण आणि आंबेगावपर्यंत पोहोचली आहे. अपहरण करून खुनाच्या घटना घडत आहेत. यावर पोलीस प्रशासन घटना घडल्यानंतर आरोपींच्या मुसक्या आवळत आहेत. मात्र, सामाजिक स्वास्थ बिघडविणाऱ्या गुन्हेगारीवर अकुंश ठेवण्याची मानसिकता अजून अंगीकारली नाही.
लोणीकंदची जागा गुन्हेगारांना सुरक्षित
शिक्रापूर हद्दीत यापूर्वी खून झालेल्यांचे मृतदेह लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेकून दिले जात आहे. अशा घटना घडत असताना लोणीकंद पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी यांनी अद्याप सतर्कता बाळगली नाही. मृतदेह आढळल्यानंतर तो मृतदेह शिक्रापुरात हद्दीतील असतो, याची धारणा लोणीकंद पोलिसांना झालेली आहे. त्यानंतर गुन्ह्याचा तपास शिक्रापूर पोलिसांकडे येतो. हा प्रकार गेल्या तीन वर्षांपासून घडत आहे. यावर ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज “अधोरेखित’ होत आहे.
अपहरण, खंडणीचा आलेख उंचावला
कारेगाव येथून अपहरण केलेल्या करून खून केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या तीन दिवसांत दोन घटना अपहरणाच्या घडलेल्या आहेत. यातून खंडणी आणि पैशांच्या देवाणघेवाणीवरून हा प्रकार घडला आहे. त्यामुळे खेड, शिरूर, मंचर हे तालुके गुन्हेगारीविश्वामुळे “कलंकित’ होत आहेत. यावर वेळीच आवर घातला नाही तर हे तालुके गुन्हेगारांचे माहेरघर झाल्याशिवाय राहणार नाहीत.