मुंबई – माजी खासदार आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राजकारणातून निवृत्ती होणार असल्याची घोषणा आज मंगळवारी केली आहे. निलेश राणे यांनी अशाप्रकारे तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ट्वीटद्वारे निलेश राणे यांनी ही माहिती दिली आहे. निलेश राणे यांनी राजकारणात मन रमत नसल्याचे म्हटले आहे. परंतु त्यांच्या या निर्णयानंतर अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
निलेश राणे यांनी ट्वीटवर (एक्स) लिहिले की, “नमस्कार, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९-२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे.”
नमस्कार,
मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही.
मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम…
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 24, 2023
पुढे त्यांनी लिहीले की, “मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र”, असे निलेश राणे यांनी म्हंटले आहे.