संगमनेर – करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार उपाययोजना करण्यात अपयशी ठरले असल्याचे सांगत भाजपच्यावतीने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू करण्यात आले आहे. संगमनेरमध्ये राज्य सरकारचा निषेध करून कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी करोनासंबंधी उपाययोजना करण्यात राज्य सरकार कमी पडत असल्याचा आरोपही भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे यांनी केला. शहरातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन करोना संकटाकडे सरकारचे लक्ष वेधले.
करोनाच्या महामारीवर उपाययोजना करण्यात आणि प्रशासकीय गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकारच्या अकार्यक्षम धोरणांमुळे राज्यातील करोनाचा विळखा आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच राज्य सरकारने अद्याप कोणतीही आर्थिक मदत जाहीर केलेली नाही. केंद्र सरकारने केलेल्या मदतीवर आभार व्यक्त न करता फक्त टीका करण्यात हे सरकार धन्यता मानत आहे. सरकारला लवकरात लवकर जाग यावी आणि तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. यावेळी संगमनेर तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, ज्येष्ठ नेते रामभाऊ जाजू, दिनेश सोमाणी, विकास गुळवे उपस्थित होते.