विश्रांतवाडी, दि. 13 (प्रतिनिधी) – देशाच्या स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या राजकीय पक्षांनी जातीय भेदभाव, अस्पृश्यता मुक्त भारतचा संकल्प कधी केला नाही. भाजप सत्तेवर आली तर कॉंग्रेसमुक्तीचा, तर कॉंग्रेस सत्तेवर आल्यावर सांप्रदायिक द्वेष, आरएसएस मुक्त भारताचा संकल्प करते. स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या कुठल्याही पक्षाने अस्पृश्यता, जातीय भेदभाव, गरीबी, बेरोजगारी, दलित महिला अत्याचार मुक्तीची साधी चर्चा देखील केली नाही. परंतु, सर्वजनाच्या हितासाठी आणि सर्वजनाच्या सुखासाठी केवळ बसपा हाच पक्ष स्थापनेपासून प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन प्रदेश प्रभारी माजी खासदार डॉ.अशोक सिद्धार्थ यांनी केले.
यावेळी डॉ. अशोक सिद्धार्थ यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवनरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रदेश प्रभारी नितीन सिंह यांना पुणेरत्न तर प्रमोद रैना यांना शाहुरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बसपा पुणे जिल्ह्याच्यावतीने येरवडा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित “भ्रष्टाचार मुक्त पुणे’संकल्पासाठी आयोजित भव्य कार्यकर्ता मेळाव्यात डॉ. सिद्धार्थ बोलत होते. यावेळी प्रदेश प्रभारी नितीन सिंह, प्रदेश प्रभारी प्रमोद रैना, प्रदेशाध्यक्ष ऍड. संदीप ताजने, प्रदेश प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी, सुदीप गायकवाड, अप्पा लोकरे, भाऊ शिंदे, अजित ठोकळे, सुरेश गायकवाड, बाळासाहेब आवारे, शीतल गायकवाड, अभिजित मनवर, रमेश गायकवाड, अशोक गायकवाड, मेहमूद जकाते, सागर खंडे, मोहमद शफी, बापू कुदळे, निधी वैद्य, सुरेखा कांबळे, सिद्धार्थ कांबळे, प्रीतम धारिया आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन प्रदेश महासचिव सुदीप गायकवाड यांनी तर प्रास्ताविक डॉ.चलवादी यांनी केले.
…बसपाच पर्याय : डॉ. चलवादी
भ्रष्टाचारामुळेच गोरगरीब, पीडित, शोषित महामानव डॉ.बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारांपासून वंचित आहेत. स्वातंत्र्यानंतर देखील अनेकांना साध्या जातीच्या दाखल्यासाठी प्रशासनाच्या पायऱ्या झिझवाव्या लागत आहेत. सात-बारासाठी लाच दिली नाही, फेरफार केला जात नाही. केवळ लाच देणाऱ्यांचे कामं होतात. अशात परिर्वतनासाठी बसपाच एकमेव पर्याय आहे, असे मत प्रदेश प्रभारी डॉ. हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केले.