पिंपरी – कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याबाबत त्वरीत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. मंत्रालयात संघटनेच्या प्रतिनिधींशी मंत्री सामंत यांची विविध प्रश्नांबाबत बैठक झाली. या वेळी हे आश्वासन दिले असल्याची माहिती ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तसेच ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली.
ऑटो, टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात कृती समितीचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस शिवाजी गोरे, कृती समिती उपाध्यक्ष बबलू आतिश खान, रिक्षा चालकांचे नेते राहुल कांबळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, राष्ट्रवादीच्या युनियनचे अशपाक पठाण, महाराष्ट्र रिक्षा पंचायत ठाणे जिल्हा अध्यक्ष आशिष देशपांडे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रामध्ये 20 लाख ऑटो रिक्षा चालक-मालक असून त्यांना कोणत्याही प्रकारची सामाजिक सुरक्षा दिली जात नाही. अपघाती विम्याचे संरक्षण मिळावे, मुलांच्या शिक्षणासाठी सरकारच्या वतीने मदत मिळावी.
वृद्धापकाळात पेन्शन मिळावी. मुक्त रिक्षा परवाना बंद करावा, ओला उबेर टॅक्सी व रिक्षा मधील भाड्याचे तफावत कमी करण्यासाठी पॉलिसी तयार करावी, आदी मागण्या संघटनेच्या वतीने मांडण्यात आल्या. या वर योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन मंत्री सामंत यांनी दिले.