मुंबई: मार्च महिन्यामध्ये रिझर्व बॅंकेने टर्म लोन घेतलेल्या कर्जदारांना करोनाव्हायरस मुळे तीन महिने हप्ता पुढे ढकलण्याची योजना सुरू केली होती. मात्र अनेकांना या योजनेचा कसा लाभ घ्यावा हे माहीत नसल्यामुळे त्यांना निर्णय घेता आला नाही.
मात्र आता स्टेट बॅंकेने यातील संदिग्धता दूर केली आहे. स्टेट बॅंकेने आपल्या 85 लाख कर्ज घेतलेल्या ग्राहकांना एसएमएस पाठवून आपल्याला जुलै ते ऑगस्ट दरम्यान हप्ता न देण्याच्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे का अशी विचारणा केली आहे. एसएमएसमध्ये दिलेल्या मोबाइल क्रमांकावर हो किंवा नाही हा पर्याय पाठविण्याची सूचना केली आहे.
मार्च, एप्रिल, मे दरम्यानच्या योजनेचा स्टेट बॅंकेच्या केवळ 20 टक्के ग्राहकांनी फायदा घेतला आहे. मात्र इतर बॅंकांचे प्रमाण या तुलनेत जास्त आहे. दरम्यान या कालावधीत व्याज आकारणे बरोबर नाही अशा आशयाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि रिझर्व बॅंकेकडे स्पष्टीकरण मागितले असून यासंदर्भातील सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे.