मुंबई : रिझर्व्ह बॅंकेच्या फेररचनेच्या प्रस्तावानुसार स्टेट बॅंकेने येस बॅंकेचे 49 टक्के समभाग घेण्याची तयारी दर्शवली असली तरी, स्टेट बॅंकेची गुंतवणुकीची मर्यादा दहा हजार कोटी रूपये असेल, असे बॅंकेचे चेअरमन राजेश कुमार यांनी शनिवारी स्पष्ट केले.
धोरणात्मक गुंतवणूक करणाऱ्या बॅंकेला 49 टक्के शेअर्स घ्यावे लागतील. गुंतवणूक केल्यानंतर तीन वर्ष हे समभाग 26 टक्क्यांखाली आणता येणार नाहीत, असे रिझर्व्ह बॅंकेने शुक्रवारी स्पष्ट केले होते. कुमार म्हणाले, स्टेट बॅंकेने एकट्याने 49 टक्के शेअर घ्यायचे ठरवले तरी तातडीने करावयाची गुंतवणूक दोन हजार 450 कोटी रुपये असेल. मात्र आम्ही दहा हजार कोटी रूपये गुंतवणुकीची मर्यादा घालून घेतली आहे. बॅंकेत गुंतवणूक करण्याची गरज दहा हजार कोटीची आहे, असे मानण्यात येते, त्यावरून ही सीमा घालून घेतली आहे.
बॅंकेच्या फेररचना योजनेचा आणि त्यांच्या गुंतवणुकीचा आराखडा प्राप्त झाला असून त्यावर आमचे विधी मंडळ काम करत आहे. ते पूर्ण झाल्यावर आम्ही आमची प्रतिक्रिया घेऊन रिझर्व्ह बॅंकेकडे जाऊ, असे त्यांनी सांगितले.
येस बॅंकेच्या फेररचनेत स्टेट बॅंकेने स्वारस्य दाखवल्यापासून अनेक गुंतवणूकदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. त्यांच्यासोबत आम्ही प्राथमिक चर्चा केलीआहे. आमचे गुंतवणूक पथक त्यांच्याशी चर्चा करून आम्ही शक्यता पडताळून पाहू, असे त्यांनी सांगितले.