संगमनेर -यावर्षी कमी पर्जन्यमान झाला आहे. त्यामुळे काही गावांमध्ये पाण्याची कमतरता भासत आहे. येणाऱ्या एक – दीड महिन्यात पाण्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळे ज्या गावांची मागणी असेल त्या ठिकाणी अधिकारी पाठवून माहिती घेऊन तातडीने पिण्याच्या पाण्याचे टॅंकर उपलब्ध करून द्या, अशा सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
संगमनेर उपविभागीय कार्यालय येथे झालेल्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सभापती सुनंदाताई जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, जि. प. सदस्य अजय फटांगरे, भाऊसाहेब कुटे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत रहाटळ, किरण मिंडे, काशिनाथ गोंदे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोरुळे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, राजेश तिटमे उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, काही वर्षांपूर्वी शंभर टॅंकरची मागणी या तालुक्यात होत होती. अशा कठीण परिस्थितीतून अत्यंत चांगल्या पद्धतीने दुष्काळी परिस्थिती हाताळली. यावर्षी कमी पाऊस झाल्याने काही गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे ज्या ठिकाणी मागणी असेल त्या ठिकाणी तातडीने अधिकारी पाठवून पाणी पिण्याच्या पाण्याचे टॅंकर उपलब्ध करून द्या.
तसेच ज्या गावांमध्ये रोजगार हमीच्या कामांची मागणी असेल आणि 20 मजूर कामावर येण्यास तयार असेल तेथे ही तातडीने रोजगार हमीचे कामे सुरू करा अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत तसेच तालुक्यात तलाव दुरुस्तीसाठी मोठा निधी आला असून गावगावचे पदाधिकाऱ्यांनी तलाव दुरुस्तीचे कामे चांगली करून घ्या असेही सांगितले. तहसीलदार अमोल निकम यांनी प्रास्ताविक केले तर गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी आभार मानले केले.