इस्लामाबाद – पाकिस्तानात धान्याचे पिठ प्रचंड महागल्यामुळे ग्राहकांमद्ये प्रचंड चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार घडला आहे. या चेंगराचेंगरीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सिंध प्रांतातील मिरपुरखास जिल्ह्यात ही घटना घडली आहे. गलिस्तान ए बाल्दिया पार्कजवळ आयुक्तांच्या कार्यालयाशेजारी दोन मिनी ट्रकमधून स्वस्त पिठाच्या गोण्यांची विक्री होत होती. हे पिठ 65 रुपये प्रति किलो दराने विकले जात होते. इतक्या स्वस्त दराने पिठ मिळत असल्यामुळे या मिनी ट्रक बोवती प्रचंड गर्दी जमा झाली होती. या गर्दीमध्ये चेंगराचेंगरी झाल्यामुळे हरीसिंह कोलही हा 40 वर्षीय व्यक्ती खाली पडला आणि गर्दीमध्ये त्याला जागीच तुडवले गेले. त्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
ही चेंगराचेंगरी नक्की कशामुळे झाली, हे समजू शकलेले नाही. अन्न वितरण विबागाच्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी हरीसिंह कोलही यांच्या नातेवाईकांनी मिरपुरखास प्रेस क्लबच्या बाहेर पाच तास धरणे आंदोलन केले होते. दोषींवर कारवाईचे आश्वासन पोलिसांनी दिल्यावर त्यांनी हे धरणे आंदोलन मागे घेतले.
या व्यतिर्क्त शाहिद बेनझिराबाद येथे पिठाच्या गिरणीबाहेरही अशाच प्रकारे झालेल्या या चेंगराचेंगरीमध्ये अन्य 3 महिला आणि एक लहान मुलगा देखील जखमी झाले आहेत. दरम्यान बलुचिस्तानातील गव्हाचा साठा पूर्णपणे संपुष्टात आल्याचे प्रांताचे अन्न मं6ी झमारक अचकझाई यांनी म्हटले आहे. यापुढच्या काळात अन्नधान्याची प्रचंड टंचाई जाणवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
प्रचंड महागाई –
पाकिस्तानात धान्य आणि दान्याच्या पिठाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. 20 रुपये किलोने मिळणारे धान्याचे पिठ कराची शहरात 140 ते 160 रुपये प्रति किलो दराने विकले जाते आहे. इस्लामाबाद आणि पेशावरमध्ये 10 किलोची दान्याच्या पिटाची गोणी 1,500 रुपये दराने विकली जाते आहे. तर क्वेट्टा शहरात 20 किलोची धान्याच्या पिठाची गोणी 2,800 रुपयांना विकली जाते आहे.