नागपूर – राज्यातील कॉंग्रेसचे एकमेव खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांनी वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यासाठी कंबर कसली आहे. वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून कॉंग्रेस हायकमांडसोबत चर्चा करू, असे धानोरकर यांनी सांगितले. त्याला काहीच दिवस झाले असताना आता काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मैदानात उतरले आहे. यावरून काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी मोदींनी पराभूत करण्यासाठी चंग बांधल्याचे दिसत आहे.
नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीमधून निवडणूक लढण्यास तयार असल्याची घोषणा नाना पटोले यांनी केली आहे. केंद्र सरकारनं लागू केलेले तिन्ही कृषी कायदे रद्द केल्याशिवाय हे आंदोलन समाप्त होणार नाही, असं नाना पटोले यावेळी बोलताना म्हणाले.
भाजपमध्ये खासदार असताना देखील नरेंद्र मोदी यांना आव्हान देत पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. आता त्यांनी थेट नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं म्हटलं आहे. त्यासाठी पक्षानं आदेश देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.
याआधी धानोरकर यांनी मोदीविरुद्ध लढण्याची तयारी दर्शविली होती. निवडणुका व्यवस्थित नियोजन करून लढायच्या असतात. निवडणूक कशी जिंकायची हे मला चांगले कळते. पहिल्यांदा निवडणूक हरलो तेव्हा मी चांगला परिपाठ शिकलो. तेव्हापासून मी कोणतीही निवडणूक हरलेलो नाही. माझ्या हातात तीन वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे मोदींविरुद्ध विजय मिळवणे कठीण नसल्याचे त्यांनी म्हटले होते.