कोलंबो – सध्या श्रीलंकेवर असलेले आर्थिक संकट आणि सरकारविरोधातील निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे क्रिकेटपटू आणि चित्रपट कलाकारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सनथ जयसूर्या, लसिथ मलिंगा, अर्जुन रणतुंगा, कुमार संगकारा आणि जॅकलिन फर्नांडिस यांनी महागाई आणि टंचाईने त्रस्त असलेल्या आपल्या लोकांबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तसेच भारत आणि इतर देशांकडून मदत मागितली आहे.
श्रीलंकेतील परिस्थितीबद्दल काहींनी सध्याच्या राजपक्षे सरकारला जबाबदार धरले आहे. तर काहींनी लोकांच्या त्रासात एकजूट दाखवण्याचे आवाहन केले आहे. श्रीलंकेत वाढती महागाई आणि पेट्रोल, गॅस आणि खाद्यपदार्थांच्या तुटवड्यामुळे लाखो लोक अनेक दिवसांपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.
यावर माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या म्हणाला, “लोकांना अशा परिस्थितीतून जावे लागतय हे दुर्दैव आहे. लोक असं जगू शकत नाहीत. येथे गॅसचा तुटवडा असून तासनतास वीज नसते.
“लोकांनी त्यांच्या अडचणी श्रीलंका सरकारला दाखवण्यासाठी निदर्शने सुरू केली आहेत. संबंधितांनी ती सोडवली नाही तर देशोधडीला लागेल. यावेळी त्याची जबाबदारी सध्याच्या सरकारवर आहे.
जयसूर्या म्हणला, आपल्या देशाचा शेजारी तसेच मोठा भाऊ भारताने आपल्याला नेहमीच मदत केली आहे. आम्ही भारत सरकार आणि पंतप्रधान मोदींचे आभारी आहोत. आमच्यासाठी सध्याच्या परिस्थितीत जगणे सोपे नाही. भारत आणि इतर देशांच्या मदतीने यातून बाहेर पडण्याची आम्हाला आशा आहे.