भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याला यंदाच्या आयपीएल स्पर्धेत कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. गेल्या वर्षांपूर्वी पर्यंत जो सर्वच संघांसाठी महत्त्वाचा होता, त्याच इशांतकडे यंदा साफ दुर्लक्ष करण्यात आले. या स्पर्धेतील कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू यांच्यात झालेल्या सामन्यात तो चक्क गेस्ट बॉक्समध्ये उपस्थित होता.
विशेष पाहुण्यांसाठी हा कक्ष तयार करण्यात येतो. याच कक्षात इशांत दिसल्यामुळे अनेक प्रेक्षकांना आश्चर्यही वाटले तसेच तुमचा काळ ओसरला की तुमचे सहकारीच तुम्हाला विसरतात याची साक्ष इशांतलाही पटली असेल. या स्पर्धेचे प्रायोजक, संघ मालक, खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफमधील लोकांचे कुटुंबीय, मित्र यांच्यासाठी हा कक्ष आरक्षित असतो. याच कक्षात इशांतला पाहून असेच चित्र दिसले की कधीकाळी ही स्पर्धा गाजवणारा इशांत आता भारतीय क्रिकेटसाठी पाहुणा बनल्याचे पाहून अनेकांच्या काळजात धस्स झाले असेल.
यंदाच्या स्पर्धेत गुजरात टायटन्स व लखनौ सुपर जायंट्स हे दोन नवे संघ दाखल झाले त्यामुळे इशांतला नव्या संघाकडून खेळण्याची संधीही मिळेल असे वाटत होते. मात्र, स्पर्धेपूर्वी झालेल्या लिलावात त्याच्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. या लिलावात इशांतची बेस प्राईज दीड कोटी रुपये होती. मात्र कोणत्याही संघाने खरेदी केले नाहीच पण त्याचे नाव पुकारले गेल्यावर कोणी त्याची दाखवण्यात आलेली एव्ही (कामगिरीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग) देखील पहिली नाही.
2019 साली त्याला दिल्ली कॅपिटल्सने 1.10 कोटी रुपयांना खरेदी केले होते. तो तीन वर्षांसाठी तो दिल्ली संघाचाच भाग होता. 2008 साली कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएल स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या इशांतने आजवर 93 सामने खेळले असून त्यात सर्वात सरस 8.11 या सरासरीने 72 बळी मिळवले आहेत. 12 धावांत 5 बळी ही त्याची स्पर्धेतील आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे.
इशांतचे दिवस दोन वर्षांपूर्वीच फिरले होते, त्याची साक्ष त्याला यंदाच्या लिलावात आली इतकेच. 2019 सालानंतर त्याला भारतीय संघातही स्थान दिले जात नव्हते. यंदाच्या वर्षाच्या प्रारंभी झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही त्याचा संघात समावेश केला गेला नव्हता.
त्याने अद्याप भारतीय संघात पुनरागमन करण्याचा विश्वास अंगी बाळगला आहे कारण यंदाच्या वर्षी भारतीय संघ परदेशात काही मालिका तसेच ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वकरंडक स्पर्धा खेळणार आहे. जूनमध्ये भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करणार असून त्यावेळी जर इशांतला संघात स्थान मिळाले नाही तर तीच त्याच्या कारकिर्दीची अखेर असेल व भवीष्यात तो आयपीएलमधील संघांसह भारतीय संघासाठीही पाहुणाच ठरेल.