मुंबई – श्रीलंकेत आणीबाणी लागल्यामुळे येत्या काळात तेथे होणारी आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा भारतात आयोजित केली जाण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळत आहेत. बीसीसीआयने अद्याप यावर कोणतेही भाष्य केले नसले तरीही सर्व परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे मत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केल्यामुळे या स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेकडून भारताकडे हस्तांतरीत केले जाणार असल्याचेच दिसत आहे.
श्रीलंकेत अभूतपूर्वी महागाईचा भडका उडाला आहे. देशातील सामाजीक व राजकीय परिस्थिती रसातळाला गेली आहे. जनतेचा रोष गगनाला भिडला आहे. याच स्थितीत येथे झालेल्या भारत व श्रीलंका यांच्यातील महिला क्रिकेट मालिकेला तसेच त्यानंतर पुरुष संघाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेदरम्यानही नागरिकांनी आंदोलन केले होते. देशात दनतेला खाण्यासाठी अन्न उपलब्ध होत नसताना क्रिकेटचे सामने का भरवले जातात असा संतप्त सवालही आता नागरिक करत असल्याने आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेलाही धोका निर्माण झाला आहे.
श्रीलंका आर्थिक संकटातून जात आहे. त्यांची जनता मूलभूत गरजांसाठी झगडत आहेत अशा वेळी श्रीलंका क्रिकेट मंडळ आशिया करंडक स्पर्धेचे आयोजन करू शकेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, सध्या मी यावर काही भाष्य करू शकत नाही. आम्ही लक्ष ठेवू आहोत. श्रीलंकेतील दिवाळखोरीच्या आर्थिक व्यवस्थापनामुळे हलाखीची स्थिती भोगावी लागत असलेल्या सर्वसामान्य लोकांनी थेट अध्यक्षीय प्रासादात घुसून सत्ताधाऱ्यांविषयीचा रोष प्रकट केला आहे. मात्र, अद्याप या स्पर्धेच्या यजमानपदाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असे मत सौरव गांगुली यांनी व्यक्त केल्याने बीसीसीआय या स्पर्धेच्या आयोजनाची दावेदारी करु शकते असेच संकेत मिळत आहेत.
पाक संघाला अनुमती मिळणार का..?
आशिया स्पर्धेचे यजमानपद जर श्रीलंकेकडून भारताकडे आले तर भारतात येऊन पाकिस्तानचा संघ खेळणार का, असाही प्रश्न आहे. भारत व पाकिस्तान या दोन देशांतील राजकीय वातावरण तणावपूर्ण असल्यामुळे पाकच्या संघाला भारतात येण्याची परवानगी केंद्र सरकार देणार का? हे पाहावे लागणार आहे. अर्थात यजमानपद भारकातडेच राहून त्रयस्थ ठीकाणीही ही स्पर्धा घेतली जाऊ शकते. शारजा, अबुधाबी हे देखील बीसीसीआयसमोर सर्वोत्तम पर्याय आहेत. आता बीसीसीआय व आशिया क्रिकेट समितीच्या निर्णयावर सर्व अवलंबून राहणार आहे.