राहुरी -करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार तालुक्याचे प्रशासन अधिक सजग झाले आहे. सारी व करोना या विषाणूची तपासणी करण्यासाठी तालुक्याच्या ग्रामीण भागासाह शहरात पथक तैनात करण्यात येवून घरोघरी जावून कुटूंबातील प्रत्येकाची तपासणी सुरु झाल्याची माहिती साहाय्यक जिल्हाधिकारी असिमा मित्तल, तहसीलदार फसियोद्दीन शेख व तालुका आरोग्याधिकारी डॉ. नलिनी विखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राहुरीच्या कृषी विद्यापीठात कोव्हीड केअर सेंटर, इन्सिट्युशन क्वारंटाईन सेंटरची उभारणी झालेली असून या अंतर्गत सहाशे बेडची अत्याधुनिक सुविधा तयार असून करोना संशयीत रुग्ण आढळल्यास त्याची स्वॅंबची तपासणी येथेच घेण्यात येवून जिल्हा रुग्णालयाकडून आलेल्या रिपोर्टनुसार विद्यापीठाच्या सेंटरमधे पूढील उपचार करण्यात येतील. नागरिकांनी घाबरुन न जाता स्वतःहून पुढाकार घेत करोना संकटात प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच कुठल्याही अफवांना बळी न पडता प्रशासनाला कळवावे.
तालुक्याच्या ग्रामीण भागातील 2 लाख 70 हजार नागरिक व शहराच्या 40 हजार नागरिकांची सारी व कोरोना तपासणी करण्यासाठी सर्व्हे सुरु झाला असून प्रत्येकाची घरोघरी जावून ग्रामीण भागात तपासणीसाठी 40 जणांचे आरोग्यपथक तैनात करण्यात आले आहे तर शहरी भागासाठी 10 जणांचे आरोग्यपथक तैनात करण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.