आयपीएल समितीच्या माजी अध्यक्षांचे सुतोवाच
नवी दिल्ली – करोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असताना आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याचा विचार करणे सध्यातरी शक्य नाही. त्यामुळे करोनाच्या सावटाखाली ही स्पर्धा खेळविणे शक्य होणार नाही, अशा शब्दात बीसीसीआयच्या आयपीएल समितीचे माजी अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
देशात सध्या लॉकडाऊन आहे, त्यातच करोनाचा प्रसार वाढत आहे. ही सगळी परिस्थिती पाहता आयपीएल खेळवून खेळाडूंसह लोकांच्या जीवाशी खेळ करता कामा नये. स्पर्धा काय पुढील वर्षी घेता येईल. सध्या तरी नागरिकांचे आरोग्य आणि त्यांचा जीव महत्वाचा आहे, असेही शुक्ला यांनी स्पष्ट केले.
देशातील नागरिक आपापल्या परिने करोनाविरुद्धच्या लढ्यात सरकारला सहकार्य करत आहेत. मग बीसीसीआयनेही स्पर्धा खेळविण्याचा अट्टहास करु नये. देश कोणत्या संकटातून जात आहे, याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आज जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ अशी ओळख असलेल्या बीसीसीआयला काही हजार कोटींचे नुकसान होईल असे जरी सांगितले जात असले तरीही हे नुकसान टाळण्यासाठी लोकांच्या जीवाशी का खेळायचे. एकवेळ रिकामी मैदाने ठेवु, प्रेक्षकांना प्रवेश देणार नाही अशी विसंवादी भूमीका घेण्यापेक्षा आपल्यावरची जबाबदारी ओळखुन विनाकारण स्पर्धेच्या आयोजनाचे प्रयत्न का सुरु ठेवले जात आहेत याचेही आश्चर्य वाटत आहे, असेही शुक्ला यांनी नमुद केले.
करोनामुळे एखादे राज्य नव्हे तर संपूर्ण देश आणि संपूर्ण जग धोक्यात आले आहे अशा वेळी कोणी स्पर्धेची अपेक्षा करत असेल तर तो मुर्खपणाचा विचार करतो असेच म्हणावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन केला. त्यामुळे 29 मार्चपासून सुरु होणारी आयपीएल 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली गेली. मात्र, एकूण परिस्थिती पाहता या आठवड्यात देखील ही स्पर्धा सुरु करणे शक्य नाही. पुढील काळात देखील परिस्थिती पूर्वपदावर आली तरच स्पर्धेचा विचार केला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले.