नवी दिल्ली – आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्री याच्या नेतृत्वाखालील भारताचा प्रमुख फुटबॉल संघ पाठविण्याबाबत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला (एआयएफएफ) केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेला चीनमधील हॅंगझोऊ येथे येत्या 23 सप्टेंबरपासून सुरुवात होईल. जाकार्ता येथे 2018 साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाला सहभागासाठी परवानगी मिळाली नव्हती. भारतीय फुटबॉल संघ सध्या आशियात 18 व्या क्रमांकावर आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी क्रीडा मंत्रालयाच्या नियमानुसार पहिल्या आठ क्रमांकावरील संघांनाच पाठविले जाते. क्रोएशियन मार्गदर्शक इगोर स्टिमॅक यांच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाने फिफाच्या जागतिक मानांकनात पहिल्या 100 संघांत स्थान मिळवले आहे. त्यांनी नुकतेच लेबनॉन, कुवेत या संघांना नमवून सॅफ फुटबॉल स्पर्धाही जिंकली होती.
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या नियमानुसार फुटबॉल संघात 23 वर्षांपेक्षा जास्त वयाचे तीन खेळाडू खेळविता येतात. भारताच्या सध्याच्या राष्ट्रीय संघात 23 वर्षांखालील सात खेळाडू आहेत. त्यामुळे कर्णधार सुनील छेत्री, गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू, बचावपटू संदेश झिंगन हे आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्यासाठी आता मंजुरी मिळाल्याने सज्ज आहेत.
एआयएफएफने 23 वर्षांखालील वयोगटातील 50 खेळाडूंची यादी तयार केली आहे. या वयोगटात खेळाडूंचा चांगला संच तयार व्हावा हा त्यामागील उद्देश आहे. या खेळाडूंचा उपयोग एएफसी 23 वर्षांखालील आशियाई करंडक पात्रता फेरी, थायलंडमधील किंग्स कप आदी स्पर्धांमध्ये होईल.