मुंबई – “महाराष्ट्रात असलेल्या ऐतिहासिक खजिन्यांचे संवर्धन करण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य शासनाने अशा संस्थांच्या मागे उभे राहिले पाहिजे. आता राज्य शासनाशी बोलणे अवघड आहे. मात्र, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि मी सुद्धा येथे आहे. आम्ही तिघांनी जर ठरवले तर महाराष्ट्रात काहीही बदल होऊ शकतो,’ असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. या वक्तव्यासह राज्यातील राजकारणात येत्या काळात होणाऱ्या बदलाचेही त्यांनी संकेत दिले आहेत.
धुळे येथील इतिहासाचार्य वि.का. राजवाडे संशोधन मंडळाच्या वतीने येथील यशवंतराव चव्हाण सेंटर सभागृहात सहा ऐतिहासिक ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पवारांसह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी पवारांनी तिघांच्या ताकदीबाबद वक्तव्य करून नवीन राजकीय चर्चेला तोंड फोडले आहे. महाविकास आघाडीची मोट बांधण्यात या तिन्ही नेत्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यानंतर मागील वर्षी शिवसेनेत फुट पडली आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यासोबतच जुलै महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रवादीतही बंडखोरी झाली आणि अजित पवारांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नऊ आमदार राज्यात मंत्री झाले आहेत.