27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा करीत आहोत. महाराष्ट्राचं लोकसंचित जपणारं, ढवणारं, प्रवाही ठेवणारं आणि उन्नत करणारं एकमेव माध्यम म्हणजे मराठी भाषा होय. या मराठी भाषेनेच आजवर मराठी माणसाची अस्मिता जोपासली व जगवली आहे.
भाषा हे मानवी संस्कृतीचे फार मोठे संचित आहे. मनुष्य प्राण्याला आपल्या भावना व विचार बोलता येतात, लिहिता येतात. “बोलणे’ आणि “लिहिणे’ यातून माणूस स्वतंत्रपणे अभिव्यक्त होतो, अशी अभिव्यक्ती जगाच्या पाठीवरील इतर कोणत्याही प्राण्यांमध्ये नाही. माणसाचे वेगळेपण ते हेच! म्हणूनच “माणूस’ हा विचारशील आणि सांस्कृतिक प्राणी आहे, असे म्हटले जाते. याकरिता माणसाने स्वत:च्या गरजेपोटी ज्ञान आणि विज्ञानाचा शोध लावला, त्यात सर्वात महत्त्वाची उपलब्धी म्हणजे “भाषा’ होय. भाषेमुळेच सर्व मानवी व्यवहार सुरळीत होत आहेत. मराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा, राजभाषा आहे. महाराष्ट्राच्या चिंतनाचं, प्रगटनाचं, लोकव्यवहाराचं साधन म्हणून मराठी भाषा समृद्ध झाली आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राचा श्वास आहे.
मराठी भाषेने आपली स्वत:ची अशी ठळक व स्वतंत्र संस्कृती निर्माण केली आहे व आजवर ती टिकविली आहे. या मराठी भाषेनेच महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे सजीवावशेष लोकसाहित्याच्या व लोककलांच्या रुपात सांभाळले आहे व समाज मनात सातत्याने जागृत ठेवले आहे.
कोणतीही भाषा एकदम कधीच जन्मू शकत नाही, तिच्या मागे एक पूर्ण परंपरा असते, तशी मराठी भाषेच्या मागेही आहे. इसवी सनाच्या 6 व्या शतकांपासून इसवी सनाच्या 11 व्या शतकापर्यंत टिकलेल्या अपभ्रंश भाषांचं स्थित्यंतर होऊन प्रथम “यादवकालीन मराठी’चा उदय झाला. खरं तर इसवी सन 983 मध्ये दक्षिण कर्नाटकामधील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या शिलालेखावर “श्री चामुंडराये करवियले, श्रीगंगराये सुताले करवियले’ असे लिहिले आहे. हा मराठी भाषेतील आद्यशिलालेख मानला जातो. इ. स. 1189 ते 1312 पर्यंत महाराष्ट्रात यादवांची सत्ता होती, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडण-घडणीचा हा वैभवशाली काळ होता, याच काळात नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचा उदय झाला आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात लिखित ग्रंथसंपदा निर्माण केली. अर्थात, याच काळात मराठी भाषेला अनन्य साधारण असं वैभवशाली स्वरुप प्राप्त झालं.
इसवी सन 1110 मध्ये आद्यकवी मुकुंदराजांनी लिहिलेल्या “विवेकसिंधू’ या ग्रंथाने मराठी भाषेच्या ग्रंथपरंपरेची सुरुवात झाली असली तरी त्या पूर्वीही मोठ्या प्रमाणात मौखिक वाङ्मय निर्माण झाल्याचे लोकसाहित्याच्या संशोधनावरून सिद्ध झाले आहे. मराठी भाषेला वैभवी दिवस लाभलेल्या यादव राजवटीत राजाश्रय मिळाला व ग्रंथनिर्मितीची भाषा म्हणून मराठी भाषा स्वीकारली गेली, तशीच ती लोकव्यवहाराची बोलीभाषा म्हणूनही प्रचलित झाली. यादव काळात मराठी भाषेत गद्य आणि पद्य अशा दोन्ही स्वरुपात ग्रंथनिर्मिती झाली. गद्य स्वरुपातील यादवकालीन मराठीचा हा नमुना
“समस्त भक्त जने एतिः श्रीचरणां लांगतिः पासि बैसति: सर्वज्ञास, निरुपणाची प्रवृत्ती असे तरी निरुपण करिती : ना रात्री वडिल असे तरी पहड़ होये, ना! तरी आसनी नीश्चलु बैसतिः महदंबे प्रस्नु करिती: जी जी आम्ही सर्वज्ञाते चींतु सर्वज्ञ काईचीतीतिः म्हणति बाई हे सकल जीवाचे चीतिः नागवे प्रस्नु करीतिः बाबा आम्ही बाबाते चींतु बाबा काई चींतीतिः सर्वज्ञ भाणिती हे श्री प्रभूची थापु चीति:
वरील यादवकालीन गद्य मराठी भाषेवर मराठी बोलीभाषेचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव आहे. पद्य मराठी भाषेवर मराठी बोलीभाषेपेक्षा संस्कृत भाषेचाच प्रभाव अधिक जाणवतो. इ. स. 1212 मध्ये ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या भावार्थदीपिका तथा ज्ञानेश्वरीमधील संस्कृतचा प्रभाव असणारा हा उतारा-
हे सारस्वतांचे गोड । तुम्हीची लाविले जी झाड ।। तरि अवधानामृत वाड सिंपौनि कीजे ।।
मग हे रस भाव फुली फुलेल । नाना फलभारे भरेल। तुमचे नि प्रसादे होईल। उपयोगू जगा।।
अशा प्रकारच्या पद्य मराठी भाषा यादवकालीन ग्रंथातून पहायला मिळते. आद्यकवी मुंकुदराज यांनी लिहिलेल्या “विवेकसिंधू’ या काव्यग्रंथातूनही त्याची प्रचिती येते. ज्ञानेश्वराच्या कालखंडातच संतकवी नामदेव महाराजांनी मराठी भाषेचा झेंडा महाराष्ट्राच्या बाहेर फडकविला. मध्यप्रदेश, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीपर्यंत जाऊन नामदेवरायांनी मराठी भाषेतील रचना सर्वदूर नेली. ज्ञानेश्वर व आद्यकवी मुकुंदराज यांच्यापेक्षा नामदेवरायाची मराठी भाषा अधिक लोकाभिमुख होताना दिसते.
आकल्प आयुष्य । व्हावे तया कुळा । माझीया सकळा। हरीच्या दासा ।। कल्पांतीची बाधा न हो कदा काळी । ही संतमंडळी । सुखी असो।। नामा म्हणे तया । असू द्या कल्याण । जया मुक्ती विधान। पांडुरंग हरी ।।
इ. स. 1238 मध्ये महानुभाव संप्रदायातील चक्रधरस्वामींनी “लीळा चरित्र’ यासारख्या अनेक ग्रंथाची निर्मिती केली. ती मराठीच्या विकासात भर घालणारी ठरली. 1528 ते 1599 या काळात संत एकनाथ महाराजांनी “भावार्थ रामायण’ लिहिले. “एकनाथी भागवत’ या ग्रंथात तर त्यांनी “संस्कृते देवे केली । मराठी काय चोरापासुनी आली?’ असा खडा सवाल करून मराठीची थोरवी गायिली आहे.
माझ्या मराठीचीये बोलू कौतुके ।
परी अमृतातही पैजा जिंके।
असा मराठीबद्दल संत ज्ञानदेवांनी दिलेला अभिप्राय आणि संत एकनाथ महाराजांचा खडा सवाल मराठी भाषेला उंचीवर नेऊन ठेवणारा ठरला आहे. इ. स. 1600 ते 1700 असा शंभर वर्षांचा कालखंड शिवकालीन मराठी भाषेचा कालखंड म्हणून ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी या कालखंडातच रघुनाथ पंडिताकरवी राजव्यवहारासाठी मराठी भाषेचा शब्दकोश तयार करविला आणि राजाश्रय लाभलेल्या मराठी भाषेला लोकमानसातही वैभवाचे दिवस आले.
मुक्तेश्वर, रमावल्लभदास, शिवकल्याणदास, रामदास, वामनपंडित, नागेश, विठ्ठल बीडकर अशा अनेक कवींनी या काळात मराठी भाषेत ग्रंथनिर्मिती केली. संत, पंत आणि तंत कवींनी मराठी भाषेचा गद्यपद्यप्रवास समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत लोकप्रिय केला. केशवसुतांपासून मराठी कविता आधुनिकतेचा साज लेवून आली. त्याचवेळी संगीत नाटके, लोकनाट्ये, कीर्तन, भारुड, भजन यासारख्या लोककलांनी ती बहरली. लोकव्यवहारातूनही तिचा विकास झाला. म्हणी, वाक्प्रचार, उक्त्या, उखाणे, आहाणे आदी अनेकांगानी मराठी भाषा समृद्ध झाली. मराठी भाषेची नानाविध रूपे आहेत, अनन्यसाधारण अशी समृद्ध शब्दकळा आहे.
डॉ. सुनीलकुमार सरनाईक