पुणे – प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दि.20 जानेवारीपासून मध्य रेल्वे विशेष जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. वेरावल (गुजरात) आणि नागपूरसाठी पुण्यातून गाड्या सुटणार आहेत. यासह मुंबई, नागपूर, अहमदाबाद स्थानकांतून देखील विशेष गाड्या सुटणार आहेत. त्यामध्ये नागपूर-मुंबई-नागपूर सुपरफास्ट विशेष, नागपूर-अहमदाबाद-नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट विशेष या गाड्यांसह पुणे विभागातून धावणाऱ्या तीन गाड्यांचा समावेश आहे. मुंबई-बिदर त्रि-साप्ताहिक सुपरफास्ट विशेष पुणे मार्गे धावणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
पुणे-वेरावल : दि.21पासून दर गुरूवारी रात्री 8.10 वाजता सुटणार. दुसऱ्या दिवशी सायंकाळी वेरावल येथे पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात दि.23 जानेवारीपासून ही दर शनिवारी सुटणार असून, दुसऱ्या दिवशी पुण्यात दाखल होणार आहे. ही गाडी शिवाजीनगर, लोणावळा, कर्जत, कल्याण, भिवंडी रोड, वसई रोड आदी ठिकाणी थांबणार आहे.
नागपूर-पुणे-नागपूर सुपरफास्ट : दि. 19 पासून नागपुरहून दर मंगळवारी, शुक्रवारी आणि शनिवारी सायंकाळी सुटणार असून, ही गाडी पुण्यात दुसऱ्या दिवशी दाखल होणार आहे. तर पुण्याहून विशेष गाडी 20 जानेवारीपासून दर बुधवारी, शनिवार आणि सोमवारी सायंकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी सुटणार असून, ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी नागपूर येथे पोहोचणार आहे. ही गाडी दौंड कॉर्डलाइन, नगर, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला येथे थांबेल.
मुंबई-बिदर-मुंबई सुपरफास्ट : दि. 20 पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई प्रत्येक बुधवार, शुक्रवार व शनिवारी रात्री 9 वाजता वाजता सुटेल. तर, बिदर येथून दि.21 पासून प्रत्येक गुरुवार, शनिवार व रविवारी सायंकाळी 8 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता ती मुंबईला पोहचेल. ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, कर्जत, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, उदगीर, भालकी येथे थांबेल.