नवी दिल्ली: केंद्र सरकारने बारा देशांतील सुमारे 14 हजार 800 भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी 64 विशेष विमाने तिकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. 7 मे ते 13 मे या अवधीत ही विमाने तिकडे रवाना होणार आहेत. एअर इंडिया व एअर इंडिया एक्स्प्रेस या विमान कंपन्यांच्यावतीने ही विमाने तिकडे पाठवण्यात येत असून यातील प्रवाशांकडून अनुदानीत दरात तिकीट आकारले जाणार आहे.
संयुक्त अरब अमीरात, अमेरिका, ब्रिटन, कतार, सौदी अरेबिया, मलेशिया, फिलीपाईन्स, बांगलादेश, बहारीन, कुवेत, ओमान या देशांत ही विमाने पाठवली जाणार आहेत.जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. तसेच त्यांनी बाहेरील देशांची विमान सेवा बंद केली आहे. त्यामुळे हे भारतीय ठिकठिकाणी अडकून पडले होते. त्यामुळे त्यांना आणण्यासाठी ही विशेष विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यांना आणण्यासाठी नौदलांच्या जहाजांचाही वापर केला जाणार आहे.