तामीळनाडू आणि आंध्र प्रतिनिधित्वाविना
चेन्नई – नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात आपल्याला फारसे स्थान मिळाले नसल्याची भावना दक्षिण भारतात आहे. तामीळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांना तर मंत्रिमंडळात प्रतिनिधित्वच मिळालेले नाही.
यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने कर्नाटकात जोरदार कामगिरी केली. त्यापार्श्वभूमीवर, त्या राज्यातील तीन लोकसभा सदस्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. त्याशिवाय, त्या राज्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या निर्मला सीतारामन् यांच्यावर अर्थ खात्याची महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केरळ आणि तेलंगण या राज्यांनाही प्रत्येकी एक केंद्रीय मंत्रिपद मिळाले आहे.
त्याउलट, यूपीए-2 सरकारमध्ये तब्बल 9 मंत्रिपदे भुषवणाऱ्या तामीळनाडूला यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधित्वाविनाच रहावे लागले आहे. त्यामुळे तामीळनाडूतील विरोधी पक्षांना नव्या मोदी सरकारवर आणि भाजपवर टीका करण्याची आयतीच संधी मिळाली आहे. तामीळनाडूतील जनतेने भाजपचा एकही खासदार निवडून दिला नाही याचा राग पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे. त्यामुळे त्यांनी तामीळनाडूकडे दुर्लक्ष केले, अशी टीका द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांनी केली. तर तामीळनाडूत मोदीविरोधी लाट असल्याने राज्यावर अन्याय करण्यात आल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष के.एस.अळगिरी यांनी दिली.
तामीळनाडूत लोकसभेच्या एकूण 38 जागा आहेत. त्यातील तब्बल 37 जागा द्रमुक-कॉंग्रेस आघाडीने जिंकल्या. तर भाजपचा मित्रपक्ष असणाऱ्या सत्तारूढ अण्णाद्रमुकला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. सीतारामन् आणि नवे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर मूळचे तामीळनाडूचे रहिवासी आहेत. मात्र, आता त्यांचे तामीळनाडूशी कुठलेच संबंध नसल्याची भूमिका विरोधकांनी घेतली आहे.
तामीळनाडूप्रमाणेच आंध्रचाही केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधी नाही. तेलगू देसम पक्ष (टीडीपी) एनडीएचा घटक असेपर्यंत त्या पक्षाचे 2 खासदार मागील केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य होते. यावेळी टीडीपी आणि भाजप आंध्रात स्वतंत्रपणे लढले. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला आंध्रातील 25 पैकी एकही जागा मिळू शकली नाही.