अरुण गोखले
खरोखरच माझ्या जीवनातला तो परम भाग्याचा दिवस. त्या दिवशी संत सोयरोबा नाथांच्या परंपरेतील पू. गिरीशनाथजी अंबिये ह्यांच्या दर्शनाचा मला योग आला. तोही माझे ज्येष्ठ स्नेही बापटजी ह्यांचे घरी. मी स्वामींच्या दर्शनास गेलो तेव्हा ते एका खोलीत कॉटवर निजलेले होते. त्यांची पाठ दाराकडे अन् तोंड भिंतीकडे, त्यांच्या हातात छोटेसे पुस्तक होते. ते पुस्तक वाचत नव्हते तर फक्त त्यातील पाने मागे पुढे करीत होते आणि तोंडाने मात्र त्यांचा एकच घोष चालला होता. “माझा… माझा…’
तो शब्द ऐकला पण अर्थबोध होईना. मी सुचक नजरेने बापटजींकडे पाहिले. त्यांनी हातानेच नंतर सांगतो अशी खूण केली. त्यांनी स्वामींना हलकेच हाक मारली. स्वामी आमच्या दिशेने वळले. आणि माझा… माझा… असे म्हणतच त्यांनी माझा आमचा नमस्कार स्वीकारीत दर्शन दिले. त्या सिद्धदर्शनाने मन सुखावले. नंतर बापटजी म्हणाले, “”स्वामींच्या माझा माझा कोण? ह्या शोधात नेमके तुम्ही त्यांच्या दर्शनाला पुढे यावे हे तुमचे भाग्य आहे. एक सांगू कां? खरं म्हणजे आपल्या प्रत्येकालाच जीवनात हा प्रश्न सतावीत असतो. नेमका माझा कोण? माझा कोण म्हणजे जो मला समजून घेईल, जो माझा सांभाळ करेल, माझे डोळे पुसेल त्याच्या कृपेचं मोरपीस माझ्या अंगावरून फिरवेल तो माझा कोण?
कारण ह्या व्यावहारिक संसार प्रपंच्यातले सारे सगेसोयरे हे फक्त सुखाचेच सोबती असतात. त्यांचा सहवास हा काही विशिष्ट काळापुरता मर्यादित असतो. इथली साथसोबतही कायमची नसते. इथल्या नात्यागोत्यालाही स्वार्थ, मोह अन् लोभ असतो. “शिते जो वरी भुते तोवरी…’ हा या जगाचा न्याय आहे. मग माझा कोण?”
इथे संत बोध आपल्याला हेच शिकवतो की “बाबारे! तुला कितीही एकटं एकटं वाटत असंल. ते एकटेपण तुझ्या अनुभवाला येत असलं तरी मनाशी पक्की खूणगाठ मार की तू एकटा नाहीस. तर तो तुझ्या सदैव सोबत आहे. नव्हे नव्हे तो आहे म्हणूनच तू आहेस. रोज रात्री दमून भागून निजल्यावर सकाळी तुझ्या कानी हाक देऊन तुला जागवणारा कोण आहे? तुझ्या शरीरातील श्वासाची अखंड बासरी वाजवणारा कोण आहे? तो कोण आहे ह्याचाच साक्षीत्वाने शोध घे. म्हणजे तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल.